Popular Posts

Sunday, February 2, 2020

    स्वातंत्र्याचे महानायक - राजे उमाजी नाईक

महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी यौद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो. लढवय्य क्रांतीकारक आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहील. इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला. राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई, भाऊ अमृता व कृष्णा, बहिण जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती असे कुटुंब. वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक होता. सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला होता. कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरवातीला 300 च्या वर सैन्याची त्यांनी जमवा जमव केली. इंग्रजाना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले.  
इंग्रजांनी रामोशी जातीला गुन्हेगार ठरविले होते. त्यांना चरितार्थासाठी शेती किंवा दुसरा कुठलाही उद्योगधंदा नव्हता. सरळ मार्गाने इंग्रज जगू देत नव्हते. त्यामुळे पोट भरण्यासाठी लुटालूट करण्याशिवाय पर्याय नव्हता. पेशव्यांनी रामोशी वतने रद्द करुन पुरंदरगड खाली करण्याचा हूकुम दिला होता. 1804 मध्ये किल्ल्याच्या पायथ्याशी जांभुळवाडीवर हल्ला करुन त्यांना हुसकावून लावले होते. त्यामुळे त्यांनी निजामाच्या हद्दीत स्थलांतर केले. उमाजीला परिस्थितीची जाणीव झाली. त्याने आपले स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार केला. जातीतील लोकांना एकत्र करुन जागृती केली. रामोशी खंडोबाचे भक्त होते. गेलेली वतने मिळविण्यासाठी बंडाचे निशाण त्यांनी हातात घेतले.
16 फेब्रुवारी 1831 ला इंग्रजाविरुद्ध त्यांनी बंड उभारले. शिवशाहीपासून पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी नाईक घराण्याकडे होती. कोणताही ह्ल्ला परतून लावण्याची त्यांची नेहमी तयारी असे. राजे उमाजी उंचपुरे धिप्पाड होते. चांगले कुस्तीगीर असल्याने रोज दंड बैठकांचा व्यायाम करी. दांडपट्टा, कु-हाडी, तीरकामठा, गोफण, भाला फेक, घोड्यावर बसणे. तलवार चालवणे ही कला त्यांनी वडिलांकडून लवकरच अवगत केली होती. या काळातच हिंदुस्थानात इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली होती. हळुहळु मराठी मुलुख जिंकत पुणे ताब्यात घेतले होते. 1803 मध्ये दुस-या बाजीरावाला स्थानापन्न करुन त्याने इंग्रजाचा पाल्य म्हणून काम सुरु केले होते. त्याने पुरंदर किल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडुन काढून आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढत होते. त्यामुळे उमाजी नाईक जनतेच्या बाजून लढण्यासाठी पुढे झाले. भारताच्या इतिहासात 1857 च्या उठावा अगोदर क्रांतीची स्वप्ने पाहणारे व 14 वर्षे इंग्रजाना सळो की पळो करुन सोडणारे पहिले क्रांतीकारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रामोशी समाजात जन्मलेल्या उमाजी नाईक यांच्या वर इतिहास कारांनी कायमच अन्याय केला. त्यांचा पराक्रम दुर्लक्षित राहिला.
21 डिसेंबर 1830 रोजी पाठलाग करणा-या इंग्रज अधिकारी बाँईड आणि त्यांच्या सैन्याला मांढरदेवी गडावरुन बंदुका आणि गोफणीतून दगड मारुन घायाळ करुन परत पाठविले होते. काहींच प्राणही घेतले होते.
सातारा जिल्ह्यात चित्तुरसिंग यांच्या नेतृत्वाखाली तर पुरंदर भागात उमाजी नाईक यांनी लुटालुट सुरु केली.1824 मध्ये कडेकोट बंदोबस्त असूनही भांबुर्ड्याची तिजोरी लुटली. मिरजेच्या पटवर्धनांची मंडळी पुण्याला जाताना त्यांच्यावर छापा टाकून मोठा ऐवज लुटला. 1826 साली एप्रिल महिन्यात पंढरपूराहून पुण्याला जाणा-या सावकाराला लुटुन त्याची मालमत्ता ताब्यात घेतली. आँक्टोबर महिन्यात जेजुरीच्या पोलीस चौकीवर हल्ला करुन बंदुका पळविल्या. जेणेकरुन इंग्रज हैराण होतील अशा मोहिमा ते आखीत. उमाजीला पकडून देण्यासाठी इंग्रजानी मोठे बक्षिस जाहीर केलेसर्वसामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची ते काळजी घेत. एका शेतक-याला त्याची गहाण ठेवलेली जमीन सोडवून घेण्यास मदत केली. एकाला रोख रक्कम दिली. लग्नाच्या व-हाडातील गरीब वधुवरांना आपल्या जवळचे दागिने दिले. जंगलातून त्यांना सुखरुप घरी पोचवले.
इंग्रजाना हाकलून देण्याचे त्यांचे ध्येय होते. भुजबा, पांड्या हे उमाजीचे साथीदार होते. त्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन करुन राज्याच्या खर्चासाठी खंडणी गोळी केली. स्वतःला राजा समजून ब्राम्हणांना दक्षिणा वाटली. लोकांनी इंग्रजांना वसूल देऊ नये. कर भरल्यास घरे जाळून टाकण्याच हूकूम केला. आपला स्वतःचा  दरबार भरविण्यास सुरवात केली. लोक त्यांना मानीत होते. राज्याचा विस्तार होत होता. ठिक ठिकाणी चौक्या बसवल्या. भोगा, पांडू, कृष्णा, अमृता, सत्तू, येसाजी यांच्या स्वतंत्र लहान लहान टोळ्या होत्या. सत्तूची स्वतःची टोळी उमाजींचा उद्देश कळल्यावर त्यांना नेता मानून त्यांच्या कार्यांत सहभागी झाली.
महाराष्ट्राच्या भूमीत इंग्रजाना पहिला हादरा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उमाजी नाईक यांचे बालपणच शौर्याचा वैभवशाली वारसा असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या परिसरात गेले. अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची हिम्मत त्यांना शिवरायांच्या चरित्रातूनच मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी इंग्रजाच्या विरोधात उठाव करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. विठुजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळस्कर यांना बरोबर घेऊन जेजुरीत खंडोबारायावर भंडारा उधळीत इंग्रजा विरोधात बंड करण्याची शपथ घेतली.
इंग्रज सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून ते गोरगरिबांना अर्थिक मदत करु लागले. कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर ते भावासारखे धाऊन जातत्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्या बाबत आपुलकीची भावना निर्माण होत होती. इंग्रजाना त्रास दिल्याने उमाजी राजे यांना 1818 रोजी एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याचा काळात ते लिहायला व वाचायला शिकले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या सरकार विरोधातील कारवाया आणखी वाढल्या. उमाजी राजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांच्या सोबत येऊ लागली. त्यामुळे त्यांचे सैन्य पाच हजारापर्यंत गेले. दरोडे आणि लुटमारीमुळे इग्रंज पुरते वैतागून गेले. उमाजीराजांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी माँकिन टाँस यांनी पुरंदरच्या मामलेदारास आदेश दिले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखर, कोडीत परिसरातील डोंगरात शोध घेऊ लागला. तेथे उमाजी आणि इंग्रजांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. इंग्रजाना पराभव स्वीकारावा लागला. उमाजींनी पाच इंग्रज सैनिकांची डोकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले होते. उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करुन राहत असतं.
नोव्हेंबर 1827 रोजी इंग्रजाना त्यांनी ठणाकावून सांगितले की आज हे बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील. तुम्हाला जेरीस आणतील.
उमाजींचा जाहीरनामा
 राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरोधात जाहीरनामाच प्रसिदध केला. लोकांनी इंग्रजी नोक-या सोडाव्यात. त्यांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा देऊ नये. देशवासियांनी एकाचवेळी जागोजागी गोंधळ घालून आराजकता माजवावी. इंग्रज राजवट लवकरच संपुष्टात येत आहे. त्यांना कोणी मदत करु नये. इंग्रजाना मदत केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करील. असे सांगून नवीन स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केला. स्वतःची फौज उभी केली. उमाजीने राज्यात स्वतःचा ध्वज निर्माण केला. शिवाजी राजांचे हुबेहुब अनुकरण करीत राज्य स्थापना केली. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. जनताही उमाजींना मदत करु लागली. उमाजींचा जाहीरनामा इंग्रजांना हादरावणारा होता. 1829 साली सरकारने त्यांच्याशी समझोता करुन त्याला 120 बिघे जमीन दिली. गुन्हे माफ केले. नाईक पदवी दिली. जातीतील काही साथीदारांना नोक-या दिल्या. काही काळ त्यांनी ते मान्य केले.
उमाजींनी केलेल्या या उठावामुळे इंग्रज हादरुन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुन्हा उमाजी स्वराज्य निर्माण करीन यांची भिती त्यांना वाटू लागली. त्यामुळे उमाजीला पकडण्यासाठी त्यांनी सावकार, वतनदार यांना मोठ मोठी अमिषे दाखविली. उमाजीची माहिती देणारांस 10 हजार रुपये व चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. उमाजींच्या बहीणीवर प्रेम असलेल्या काळोजी नाईक याला उमाजीने एका दरोड्याच्या प्रकरणात शिस्त मोडून एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून त्याच्या हाताची बोटे दगडाने ठेचण्याची शिक्षा दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठी काळोजी व नाना चव्हाणही इंग्रजाना फितुर झाला. काळोजीने उमाजीराजे यांच्या बहिणीचा कपटाव्याने वापर करीत इंग्रजाना गुप्त माहिती पुरवली.
उमाजीराजे यांच्या पराक्रमावर खूष असलेल्या सरदेशमुख यांची मुलगी पुतळ हिने त्यांच्याबरोबर लग्न केले. काळोजी नाईक आणि त्याचे साथीदार दरोडा टाकण्यासाठी आले असताना वस्तीमध्ये गरीब कुटुंबावर अन्याय करीत असलेल्या काळोजीच्या विरोधात पुतळ स्वतः उभी राहिली. तिचे धाडस आणि प्रामाणिकपणा उमाजीराजांनाही भावला. पुतळ चे उमाजी नाईक यांच्यावर प्रेम होते. त्यातूनच उमाजीने तिच्याबरोबर लग्न केले.
उमाजीला पकडण्यासाठी माँन्कीटसने दिवेघाटाच्या माध्यावर सैन्याची छावणी टाकून तो शोध घेत होता. भोर, पानवडी, काळदरी, पिंगोरीच्या डोंगर द-यातून उमाजी नाईक यांचा वावर होता. त्या ठिकाणीही इंग्रज शोध घेत होते. काळोजी नाईक फितुर झाल्याचे पुतळला समजल्याने तिने उमाजीनाईकांना वाचविण्यासाठी इंग्रज अधिका-याशी काळोजीच्या वेषातून संधान साधून त्याचा डाव उलटविण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या घडणा-या नाट्यमय घडामोडी बाबत अजूनही संशोधन झालेले नाही. उमाजीराजांचा खरा इतिहास पुढे येण्यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. उमाजीं नाईक यांची तडफ, बेडरपणा, लढाऊ वृती, शिवनीती, प्रामाणिकपणा, जाज्वल्य देशप्रेम, चपळाई, खंडोबा प्रती असलेली देशभक्ती आणि जनतेत असलेला आदरयुक्त दरारा, सैन्यावरचा वचक यामुळे त्यांनी स्वराज्याचा दुसरा लढा उभारला होता. पुन्हा जनतेचे राज्य उमाजींच्या रुपाने येईल अशी शक्यता होती. पण महाराष्ट्राच्या मातीत आणखी काही नवीनच घडणार होते. फितुरीचा जुनाच शाप या मातीत आहे. काळोजी नाईक आणि नाना चव्हाणांनी गुप्त माहिती पुरवली. जोडीला जिजाला मदतीला घेऊन अखेर इंग्रजानी डाव साधला. 15 डिसेंबर1831 रोजी भोर तालुक्यातील उत्रोली गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजानी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीत काळ्या खोलीत ठेवण्यात आले. इंग्रज अधिकारी माँकिन टाँस याने उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे.उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवून न्यायधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. खडकमाळ आळीत मामलेदार कचेरी समोर देशासाठी हसत हसत नरवीर उमाजी नाईक 3 फेब्रुवारी 183२ रोजी फासावर चढले. त्यावेळी त्यांचे वय होते 43 वर्षाचे. इंग्रजानी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बाबू सोळस्कर यांनाही फाशी दिली. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा देह पिंपळाच्या झाडाला तसाच तीन दिवस लटकत ठेवला होता. अशा प्रकारे धगधगत्या क्रांतीकारकाच्या बंडाचा शेवट झाला. अशा महापुरुषाचे प्रेरणादायी स्मारक त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे उभारण्याची घोषणा अनेकवेळा झाली. पण योग्य तो न्याय अजून राजे उमाजी नाईक यांना मिळाला नाही. इतिहासकारांनी त्यांना हवे ते स्थान दिले नसले तरी जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे महानायक म्हणून उमाजीराजांचे स्थान अबादीत आहे. थरकाप उडविणा-या त्यांच्या मोहीमांच्या दंतकथा आजही लोक मोठ्या आपुलकीने सांगत असतात.

लेखक-
दशरथ यादव, पुणे (सासवड)
मो.9881098481



           
         



No comments: