Popular Posts

Thursday, November 19, 2020

संमेलनातील भाषण

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे दहावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता.पूरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०१७ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून दशरथ यादव यांनी केलेले भाषण उपस्थितांना खूप भावले. पुरोगामी विचाराचा गाभा असलेले भाषण हशा आणि टाळ्यांची दाद मिळवीत रसिकांच्या काळजाचा ठाव घेत होते.

 

सस्नेह जय जिजाऊ

 

स्वराज्याचे देखणं स्वप्न पाहणा-या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनसम्राट बळीराजा, सम्राट अशोक, चार्वाक, तेजपुंज गौतमबुदध, संत नामदेव, संत तुकाराम, क्रांती ज्योती सावित्रीमाई, ताराराणी, अहल्याबाई होळकर, फातिमाबिबी, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूमहाराज, भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सत्यशोधक दिनकरराव जवळकर या महामानवांना प्रथमता अभिवादन करतो.

विद्धेविना मती गेली

मतीविना गती गेली

गतीविना वित्त गेले

वित्ताविना शुद्र खचले

अवघे अनर्थ अविद्येने केले

असा विचार मांडून समतेच्या क्रांतीची मशाल खांद्यावर घेऊन अवघे आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित करणारे महात्मा फुले म्हणजे तेजपुंज सत्यशोधक सूर्यच.

सत्याच्या निखा-यावर चालत राहून खचलेल्या पिचलेल्या बहुजन समाजाचे हूंकार जागृत करत सनातनी सुलतानी संकटाशी लढणारा लढवैय्या क्रांतीकारक म्हणजेच महात्मा फुले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या १० व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करुन शिवविचाराचा सन्मान केल्याबद्धल मी सर्वांचा ऋणी आहे. पुरंदर तालुक्यातील खानवडी हे महात्मा फुले यांचे मूळ गाव. या गावात होणा-या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मला मिळते हा माझ्या जीवनातील एक आनंदाचा ऐतिहासिक असाच क्षण मी मानतो.

आल्याड क-हा अन पल्याड नीरा शिवशाहीचा झरा रं

शिवशंभुचा पुरंदर म्हणजे मोतियाचा तुरा रं

सातगड व नवघाटाची क-हापठारची ही दौलत मराठ्यांच्या इतिहासात कायमच अग्रभागी राहिली आहे. अनेक आक्रमणेही या भूमीने सोसून कायम नव्याची निर्मित करण्यात या भूमीचा मोलाचा वाटा आहे. काळ कोणताही असो. प्राचीन, अर्वाचीन, शिवशाही, पेशवाई, इंग्रज या प्रत्येक काळात क-हापठारने महत्वाची भूमिका बजावली आहे. माझ्या सारख्या शिवविचाराने झपाटलेल्या आणि नाविन्याचा कायम शोध घेणा-या माणसाला याच भूमीची उर्जा लेखनाला बळ देत आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणा-या छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. ब्रिटीशांना आव्हान देत शिवराज्याची प्रेरणा घेऊन स्वतःचे राज्य उभा करणा-या राजे उमाजी नाईक यांचा जन्मही पुरंदरच्या गडाच्या पायथ्याला भिवडी गावात व्हावा, संत सोपानदेवांनी समाधीसाठी पुरंदरचीच निवड करावी, छत्रपतीनी स्वराज्याची पहिली लढाई याच मातीत लढावी, बळीराजाच्या काळातील एका खंडाचा खंडोबा या मातीत जेजुरीत उभा रहावा, राजमाता अहल्यादेवींनी घोंगडीवर बसून राज्यकारभार करावा, यादवराज्यात उभारलेली हर हर महादेवाची शिल्पवैभवी देवालये भुलेश्वर, पांडेश्वर, नारायणेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर याच पठारावर उभी राहावी, पेशवाईला साथ देणारी ५२ घराणी येथेच उभी राहावी, हा काही निव्वळ योगायोग नाही. पुरंदरच्या मातीतच अशी वेगळी ताकद आहे. ऐतिहासिक, सामाजिक क्रांतीच्या अग्रभागी पुरंदरचा क-हापठार नेहमीच आघाडीवर राहिला आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक जडणघडणीत पुरंदरच्या क-हापठारचे सोनेरी पान इतिहासात नेहमीच वैभवाने झळकत राहिले आहे. बालपणापासूनच ऐतिहासिक, भौगोलिक परिसराचे वैभव मला खुणावत राहिले. येथील गडकोट म्हणजे क-हापठारचा बुलंदबुरुजच आहेत. पुरंदर, वज्रगड, कानिफनाथगड, मल्हारगड, ढवळगड, दौलतमंगळगड आणि जेजुरगड आजही वैभवाने इतिहासाच वारसा जपत उभे आहेत. सह्याद्रीपर्वताच्या डोंगररागांनी वेढलेला क-हापठार भौगोलिक दृष्टया विविधतेने नटलेला आहे. एकाच भागात महाराष्ट्राच्या विविधतेचे दर्शन येथेच पाहायला मिळते. जगाचे प्रतिबिंब भारतात, भारताचे प्रतिबिंब महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचे प्रतिबिंब पुरंदरमध्ये पाहायला मिळते. ही देणगी पुरंदरला निसर्गानेच बहाल केली आहे. दुष्काळ, पाणीटंचाई, पावसाळा, कोकणचा निसर्ग, डोंगरद-या आणि सपाट प्रदेश ही सगळी रुपे क-हापठारवर पाहायला मिळतात. अडचणीवर मात करीत झेप घेणारी इथली विद्वत्ता, सकंटाचा सामना करणारा पराक्रम इथल्या मातीच्या कणाकणात सामावलेला आहे.  

पिढ्या न पिढ्याचा अंधकार दूर करुन बहुजन समाजाला त्यांच्या मूळ रुपाची जाणीव करुन देणारा महात्मा म्हणजेच ज्योतीराव गोविंदराव फुले. त्यांच्या सहवासाने मंतरलेली इथली माती आणि माणसं सुद्धा इतिहास घडवून पिढ्या न पिढ्या संघर्ष करीत आहेत. क्रांतीकारकांच्या रक्ताने मंतरलेल्या मातीतून आजही पराक्रमाचे हूंकार ऐकायला येतात. पण हूंकार ऐकायलाही इतिहासाचे कान आणि संघर्षाची बीजे रुजलेले मन असावे लागते. त्यांनाच हे क्रांतीकारी हूंकार ऐकायला येतात. ज्यांना ज्यांना हे हूंकार ऐकायला आले त्यांनी या मातीत इतिहास घडविला. क्रांतीचे हूंकार ऐकून साहित्याच्या क्षेत्रात छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, वाल्मिक ऋषी, शाहीर सगनभाऊ, होनाजीबाळा, आचार्य अत्रे, कृ.वा.पुरंदरे, श्रीधर नाझरेकर, साहित्य मार्तंड य़शवंतराव सावंत, नामदेवराव जाधव यांच्या पर्यंत अनेकांनी इतिहास रचला. शिक्षणाच्या क्षेत्रात एकाच हरगुडे गावातील डाँ राम ताकवले, डाँ. एम.जी.ताकवले हे दोघे सखे भाऊ कुलगुरु होण्याचाही इतिहास घडला. जुन्या इतिहासाची प्रेरणा घेऊन नवा इतिहास रचणारी ही बावनकशी सोन्याची खाण म्हणजे क-हेपठारची भूमी आहे. परिवर्तनाचा ध्यास घेऊन बंड करणा-या मातीत अनेक कोहिनूर हि-यांनी कर्तृत्व गाजविले. या मालिकेतील एक तेजस्वी रत्न म्हणजेच महात्मा फुले. हजारो वर्षे जातीयतेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला मुक्त करण्याचे काम येथूनच सुरु झाले. शोषित समाजाचे दुःख दूर करण्यासाठी मूळाचा शोध घेण्याचे काम त्यांनी केले. गुलामगिरी, शेतक-यांचा आसूड, तृतीयरत्न, अखंड या साहित्यातून त्यांनी समाज उभारणीचा जागर मांडला. त्यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील कटगून. मूळगाव खानवडीतच क्रांतीची बिजे रुजली. सनातनी समाजव्यवस्था उखडून काढण्याचे बंड त्यांनी येथूनच सुरु केले. एखतपूरला पुर्वीच्या काळी गुलामांचा बाजार भरायचा. गुलामगिरी हे पुस्तकाची मूळ बिजे येथेच रुजली असावीत.

खानवडी हे क-हाकाठावरील छोटेसे टुमदार खेडं. महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार तेवत ठेवण्याचे काम सत्यशोधक दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे यांनी केले. क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, गुरुवर्य बाबुराव जगताप, नागनाथ अण्णा नायकवडी अशी कितीतरी माणसं या विचाराने भारावून काम करीत राहिली, सध्याच्या काळात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी विचाराचा झंजावात पुन्हा प्रज्वलीत केला आहे.

याच शिव(सत्य)विचाराचा जागर करावा याच हेतूने दहा वर्षापूर्वी खानवडीत महात्मा फुले यांच्या मूळगावी साहित्यसंमेलन घेण्याचा निर्णय घेतला. लोकनेते शरद पवार साहेबांनी महात्मा फुले यांचे स्मारकाचे उद्घाटन १९९५ साली केले. स्मारकात क्रांतीबाचा पुतळा बसविण्याचे काम पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केले. सासवडहून खानवडीला जाणारा रस्ता खेडेकर साहेबांनी केला. लोकांची वर्दळ वाढू लागली. क्रांतीपिठातून समाजपरिवर्तनाचा हूंकार पुन्हा ऐकायला येऊ लागला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील साहित्यिकांची मांदियाळी येऊ लागली. महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाची कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मोठ्या हिरारीने ज्यांनी सहभाग घेतला ते साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्य़क्ष शरद गोरे, राजकुमार काळभोर, राजाभाऊ जगतपा, केशवराव काकडे, सुनील धिवार, रवींद्र फुले, सुनील लोणकर, दत्ता भोंगळे, नंदकुमार दिवसे, गंगाराम जाधव अशी कित्येक जण आहेत. आज मला साहित्याच्या लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होताना दिसतोय. महात्मा फुले यांच्यावर प्रेम करणारा मोठा समाज असला तरी प्रत्यक्षात त्यांचे विचार आचारणात आणणारी मंडळी शोधावी लागतात ही मोठी खंत आहे. सत्यशोधक विचार म्हणजे आभाळातील वीज आहे, ती पकडून ठेवायला काळीजही मोठ लागते. ब्राम्हणी व्यवस्थेने दुबळे झालेले मन अजून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. सत्य कटू असते आपण नुसते म्हणत असतो, पण स्वीकारीत नाही. सत्यशोधक चळवळ तळागाळात फोपावली असती तर जातीयतेची जळमट केव्हांच गळून पडली असती. कष्टकरी, मजूर, शेतकरी वर्ग आणखी पटीने प्रगतीपथावर गेला असता. रुढी, परंपरा, अंधश्रद्धा मोडून काढली तर समाजमन सशक्त होईल. अशी फुल्यांची धारणा होती. त्यासाठी शिक्षणाची मूर्हतमेढ त्यांनी पुण्यात रोवली. स्रीशिक्षणाचा पाया घातला. हाच विचार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारून जागर केला. माणूस शिकला, अर्थिक सक्षम होताना दिसत असला तरी मनाने दुबळा आणि संघर्षापासून बाजुला जाताना दिसतोय. ही मोठी चिंता करण्यासारखी बाब आहे. माहितीतंत्रज्ञानाचा स्फोट झाला तरी परंपरेची हाडके चघळत बसणारी मंडळी समाजात कोणती क्रांती करु पाहत आहेत याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. शिकून शहाणी झालेली पिढी बुवा बाबांच्या सत्संगाला जाऊन डोलताना पाहिल्यावर मन चिंताक्रांत होते. जातीयता, धर्मवादात माणूसकी हरवली आहे. जाती धर्माचे कंपू होतायेत. भांडवलशाहीच्या हातात राजसत्ता जाऊ लागलीये, धर्माचा अतिरेक्त होत गेला तर ही लोकशाही पुन्हा धोक्याच्या वळणावर येईल. सामान्य माणूस पुन्हा संकटात गेल्या शिवाय राहणार नाही. सगळ्या सुखसोयी सोबत असताना सैरभैर जीवन जगणारा समाज महासत्तेपर्यंत कधी पोचणार. महात्मा फुल्यांच्या स्वप्नातील मानवता समाजाच्या चेह-यावर कधी फुलणार या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार याचाही विचार करावा लागेल. मानवी समाजाचे कल्याण सत्यशोधक विचारानेच होईल. याविचाराचा जागर होत राहिला पाहिजे. मग क्षेत्र कोणतेही असो. कृषी, शिक्षण, साहित्य,कला, नाट्य,प्रसारमाध्यमे या सगळ्या क्षेत्रात सत्याचा जागर होत राहिला पाहिजे. यातूनच संघर्ष करणारी स्वाभिमानी पिढी निर्माण होईल. सध्याच्या काळात मानवता कल्याणाचा विचार वेगळ्या कल्पोकल्पित वाटेने जाताना दिसतोय. समाजमनाचा कानोसा घेतला तर अस्वस्थता दिसते. याच्या मूळ कारणांचा शोध घ्यावा लागेल. महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचारच समाजाला तारु शकतो. या विचाराचा जागर तळागाळापर्यंत होत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.

धन्यवाद।

 

जिजाऊ जय शिवराय जय ज्योति जयक्रांती   

पुरंदरला नाथसंप्रदायाचा वारसा

 

संत सोपानदेव

 

महाराष्ट्रात भक्तीसंप्रदायाने हजारोवर्षे समाजप्रबोधनाचे काम केले. विषमतेच्या विरोधात संतसंप्रदायाने मानव कल्याणासाठी  संघर्ष केला. जातीभेद, गरीब श्रीमंत, अंधश्रद्धा, विषमतेच्या विरोधात बंड करणा-या संताची प्रभावळ महाराष्ट्रात निर्माण झाली. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, संत सावतामाळी, गोरोबाकाका, संत नरहरी, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम आदींनी मराठी मनाची मशागत केल्यानेच समतेची बीजे या भूमित रुजण्यास मदत झाली. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. संत विचारांचा सुगंध मराठी मातीत खोलवर रुजल्यानेच जगाला हेवा वाटावा असा पंढरीच्या वारीचा सोहळा वर्षा न वर्षे दरवर्षी पायी वारीने स्वर्ग सुखाचा आनंद अनुभवत असतो. या संत प्रभावळीतील एक रत्न म्हणजेच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेव. विठ्ठलपंत व माता रुखमिणीच्या पोटी आळंदी येथे शके ११९६ मध्ये त्यांचा जन्म झाला. संत ज्ञानेश्वरांच्या नंतर एक वर्षांनी सासवड सवंत्सरग्रामी त्यांनी संजीवन समाधि घेतली. प्राचीनकाळापासून बौद्ध, जैन, शैव व नाथसंप्रदायाने समाजमनाची मशागत केल्याने मानवता धर्माची पताका खांद्यावर घेऊन संत परंपरा गेली नऊशे वर्ष प्रबोधनाचा जागर करीत आहे. नवव्या शतकाच्या उतरार्धात महानुभाव, लिंगायत, भागवत संप्रदाय उदयास आला. नंतरच्या काळात गुरुनानकांच्या मार्गदर्शनाखाली शीख संप्रदायही काम करु लागला. भारतामध्ये शैव संप्रदायाचा झेंडा खाद्यावर घेऊन नाथसंप्रदायने समाजात आपला प्रभाव निर्माण केला. दत्तसंप्रदायानेही अनेक वर्षे समाजजागृती केली. संत नामदेवांच्या नेतृत्वाखाली भागवत धर्माची पताका भारतभर डोलाने फडकत होती. हिंदूधर्मातील अनिष्ट चाली रुढी परंपरेच्या विरोधात परिवर्तनाचा जागर नामदेवांनी कीर्तन, प्रवचनातून मांडला होता. प्रस्थापितांच्या विरोधात बंडाचा झेंडा घेऊन देशभ्रमण करणा-या नामदेवांना भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर पंढरपूरला गेले. ज्ञानेश्वर संप्रदाय त्यांनी भागवत धर्मात विलिन केला. कल्पनेच्या जगात आभाळात स्वर्ग शोधणा-या समाजाला भुवैकुंठावर पोचविण्याचे काम भागवतधर्माने केले होते. ज्ञानेश्वरांची कीर्ती वाढत असताना धाकटे बंधू सोपानदेव त्यांच्या सावलीसारखे बरोबर होते. जनमानसावर माउलींचा प्रभाव असताना सोपानदेवांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली. गीतेवर समश्लोकी टीका सोपानदेवी ग्रंथांची निर्मिती केली. माऊलींनी आळंदीत संजीवन समाधी घेतल्यानंतर एक वर्षाने संत सोपानदेवांनीही सासवडला चांबळी नदीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली. त्यावेळी निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, विसोबा खेचर, संत सावतामाळी, संत नामदेव कुटुंबासह हजर होते. संत नामदेवांच्या समाधिच्या अभंगामुळे संत ज्ञानेश्वर व सोपानदेवांचे खरे चरित्र लोकांना समजले. दोन्ही भावंडाना समाधी देण्यासाठी स्वतः पांडुरंग हजर होते. असे लडिवाळ लालित्य पुर्ण व करुणेचे अभंग नामदेवांनी लिहिले आहेत.

देव म्हणे नाम्या। मार्गशीर्ष गाढा।

जावे सासवडा उत्सवासी।।

सोपानासी आम्ही दिधले वचन।

चला अवघेजण समुदाय।।

सोपानदेवांच्या संजीवनी समाधी सोहळ्याचे वर्णन नामदेवांनी केले. साक्षात पांडुरंगाने सोपानदेवांना पीतांबर नेसवला. सप्त नद्यांच्या पाण्याने स्नान घातले.

गंध आणि अक्षता विसोबाचे हाती।

पुजा ते करिती सोपानाची।।

नारा,विठा,गोंदा पाठविला म्हादा।
झाडावया जागा समाधिची।।

सगळ्या संताना, लोकांना समाधीसोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. नागेश्वराच्या मंडपात लोक बसून होते. जनसमुदायाच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या होत्या. बाजूलाच उभी असलेली मुक्ताई धाय मोकलून रडत होती. हत्तीखडकावर निवृत्तीनाथ विचारमग्न झाले होते. संवत्सरग्रामचा अर्थ देवांनी नामदेवांना उलगडून सांगितला. ब्रम्हदेवाने तप केलेली ही भूमी आहे. सोपानदेवांना समाधिसाठी म्हणूनच ही जागा निवडली.

आल्याड क-हा अन पल्याड निरा

हा शिवशाहीचा झ-हा रं

शिवशंभुचा पुरंदर म्हणजे

मोतियाचा तुरा रं

याच क-हा पठारावर मल्हारी मार्तंड जेजुरीचा खंडोबाचा गड आहे. सह्याद्री पर्वताच्या पुर्व पश्चिम पसरलेल्या दोन समांतर डोंगर रांगावर दक्षिण बाजूला पुरंदर, वज्रगड, मल्हारगड असे तीन किल्ले आहेत. उतरेच्या डोंगररांगेवर कानिफनाथगड, सोनोरी किल्ला, ढवळगड, दौलतमंगळगड (भुलेश्वर) आहेत. शिल्पकलेचा सुंदर ठेवा असलेले यादवकालीन भुलेश्वर, नारायणेश्वर, वटेश्वर,पांडेश्वर, संगमेश्वर, शंकेश्वर ही शंभु महादेवाची मंदिरे पुरंदरची आभुषणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई याच मातीत झाली. छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म याच पुरंदर किल्ल्यावर झाला. इतिहासाचा शौर्याने मंतरलेला वैभवी वारसा पुढे आद्यक्रांतीवर राजे उमाजीनाईक, क्रांतीगुरु लहुजीवस्ताद, महात्मा ज्योतीराव फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजीबाळा, आचार्य अत्रे आदींनी जोपासला. हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या लढाईत सरसेनापती वीरबाजी पासलकर कामी आले. त्यांचे समाधी मंदिर सासवडमध्ये आहे. ५२ सरदारांचे भव्यदिव्य वाडे जुन्या इतिहासाची साक्ष देत अजूनही उभे आहेत. श्रीमंत गोदाजीराजे जगताप, श्रीमंत पिलाजीराव जाधवराव, सरदार बाळोबा कुंजीर, सरदार आबासाहेब पुरंदरे, पानसे अशा मातब्बर मंडळीनी सासवडचा इतिहास जीवंत ठेवला आहे. पहिला पेशवा श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट यांची समाधी क-हाकाठावरच आहे. भक्ती आणि शक्तीचे पावनतीर्थ म्हणजे माझे सासवड होय.

नाथसंप्रदायाचा वारसा

पुरंदरला शूरवीर,समाजसुधारक, संत, साहित्यिक व नाथसंप्रदायाचाही प्रभावी वारसा लाभला आहे. दिवेघाट माथ्यावरील बोपगावच्या डोंगरावरील कानिफनाथांचे मंदिर भाविक व पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. भव्यमंदिराला असलेला एक फूट रुंदीचा छोटासा दरवाजा कुतूहलाचा विषय आहे. शंभु महादेवांच्या मंदिराची भव्यदिव्य रांग जशी या भूमित पाहायला मिळते, तशी महादेवाचे भक्त आणि आणि नाथसंप्रदायाचा इतिहासानेही ही माती मंतरली आहे. नाथपरंपरा व शिष्यगण ही निर्माण झाले. संत सोपानदेव ही मूळचे नाथसंप्रदायातच होते. वारकरी संप्रदायाची डोलारा नाथसंप्रदायाच्या पायावर मजबुतीने उभा आहे.

 

सोपानदेवानंतरची नाथपरंपरा

 

संत ज्ञानेश्वराचे नऊ शिष्य आहेत. त्यामध्ये सोपानदेव, मुक्ताबाई, विसोबा खेचर, विमलांनद, सत्यानंद (सत्यामलनाथ), स्वरुपनाथ, चर्पटनाथ, सच्चिदानंद, रामचंद्रनृप यांचा समावेश आहे. या नऊ शिष्यापासून पुढे परंपराविस्तार झाला.

संत सोपानदेवापासून - मुचकुंदानंद (मुकुंदनाथ) अव्यक्त जनार्धन अलक्ष्य अचिन्त्य त्र्यंब्यकनाथ अशी पंरपरा निर्माण झाली. या त्र्यंबकनाथाचे दोन शिष्य कविदास मुकुंदराज व कोनेरीनाथ. कोनेरीनाथाचा शिष्य लिंगनाथ होय.

लिंगनाथ योगीहे नाथपंथी सत्पुरुष सुमारे १५० वर्षापूर्वी कर्नाटक चंदी चंदावरच्या बाजूस होऊन गेले. त्यांनी अमृतसार नावाचा योगशास्त्रविषयक ग्रंथ लिहिला. त्यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे यांचे वंशज सरफोजी भोसले तमिळनाडू (तंजावर) राजे  होते. या ग्रंथात सरफोजी राजेंचे वर्णन केल आहे. हा कवी सरफोजींचा अश्रित  असावा. कोरोनाथांनी लिंगनाथ असे आपले नाव ठेवल्याचे कवी लिहितो. लिंगनाथाचा अमृतसार हा ग्रंथ योगपर असून त्यात १५ अध्याय व १४०० ओव्या आहेत. या गंथाची रचना शके १६४६ मध्ये कावेरी तीरी तंजावर येथे झाली. हा कवी सोपानदेव परंपरेतील आहे.

  कविदास मुकुंदराजहा त्र्यंब्यक नाथाचा शिष्य असून, योगविवेक व मार्तंडदीप ग्रंथ त्यांनी लिहिला. गोरक्षनाथांच्या संस्कृत ग्रंथावरीला ही टीका आहे. गोरक्षनाथांच्या नावावर योगमार्तंड व विवेक मार्तंड असे दोन ग्रंथ आहेत. या ग्रंथावर ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचा प्रभाव दिसून येतो.

  गंगाधरनाथ- सोपान परंपरेतील जनार्दनाचा शिष्य रघुनाथ व त्याचा शिष्य गंगाधरनाथ किंवा गंगानाथ होय. यांनी शके१७२१ मध्ये गोरक्षगीता निरुपण नावाचा ग्रंथ लिहिला. बेलापूर वनातील श्रीविद्यानंद स्वामी महाराज यांच्या साधुपुरुषाच्या स्वाधयाय ग्रंथात गंगाधरनाथांच्या ग्रंथाचा समावेश होत असे.

चंदावरचा लिंगनाथ आणि तंजावरच्या गरुडमठातील कवी शंकर हा नाथपंथी होता. गहिनिनाथांचा शिष्य प्रकाशनाथ होता तो नेमका कोणता याचा शोध घ्यावा लागेल.

आदिनाथ भैरवहे निघोज (ता.खेड जिल्हा पुणे) या गावचे.  त्यांचा जन्म येथेच झाला. शके १७५६ मध्ये विटे येथे नाथलिलामृत ग्रंथ त्यांनी लिहिला. आदिनाथाने वैद्य ११ शके १७६७ मध्ये नाशिक येथे समाधी घेतली. आदिनाथाचे वंशज निघोज्यात आहेत. आदिनाथाचा भैरवाचा नाथलीलामृत नवनाथभक्तीसाराहून सरस ग्रंथ आहे. तरीही राज्यात त्याला लोकप्रिता लाभली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जाते. २८ अध्याय आणि ५४९३ ओव्या या ग्रंथात आहेत. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, दासोपंत, एकनाथ, रामदास, नाभाजी, महीपती या संतकवीच्या साहित्यसागरात आदिनाथाने मनसोक्त विहार केलाय. त्यामुळे ग्रंथाचे महत्व खूप आहे. निवृती, ज्ञानेश्वर, सोपान मुक्ताबाई यांचा नाथसंप्रदायात समावेश करायला हवा. गहिनिनाथांकडून हा ठेवा निवृतीनाथांकडे आला. गहिनीनाथांनी जो उपदेश निवृतीला केला तो ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे.

पुरंदरचा नाथसांप्रदायाचा वारसा

सासवडचे गणेशनाथ आणि द्रविड देशातील प्रकाशनाथ असे आणखी दोन सोपानदेवांचे शिष्य होते. द्रवीड देशातील प्रकाशनाथांच्या परंपरेचा शोध घेतल्यास ज्ञानेश्वरोत्तर नाथसंप्रदायाचा अभ्यास करता येईल. नाथसंप्रदाय हा संत सांप्रदायाचा मूळ स्रोत आहे. आदिनाथ गूरू सकळ सिद्धांचा।

मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य।। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वोळला गहिनीप्रती।।गहिनीप्रसादे निवृतीदातार। ज्ञानदेवा सार चोजविले।।

 सासवडला शिंपीआळीत निरगुडे परिवाराकडे नवनाथ पैकी चौथे कानिफनाथ यांची समाधी आहे. हे स्थान पुरातन असून, पुर्वी वाडावजा बखळीतील मोकळ्या जागेत हे समाधीस्थान होते. कालांतराने निरगुडे परिवारातील खंडोजी निरगुडे यांनी त्यास छत निवारा केला. कै. खंडोजीचे पुत्र कै. बाळोबा निरगुडे यांनी गृहस्थाश्रमानंतर नाथदिक्षा घेऊन या समाधीस्थानातच अखेरपर्यंत वास्तव्य केले. या समाधीवर पंचधातुंचा नाथांचा मुखवटा होता. मुकुटावर मोर तर कानात मासोळ्यांची कलाकुसर होती. परंतु समाधी उघड्यावर असल्याने मुखवट्याची चोरी झाली. १९७९ साली कै. बाळोबांचे दुसरे चिरंजीव कै. सोमनाथ यांनी या जागेचा जीर्णोद्धार केला. त्यांचे पुत्र सुरेश यांनी नाथदीक्षा घेतली होती. त्यांनी पुन्हा पंचधातुचा मुखवटा कोल्हापूरहून आणला. २००९ साली याठिकाणी सिमेंटमध्ये घराचे काम करताना मध्यभागी मंदिराचेही काम केले. मंदिरात दररोज पंचोपचार पुजा व सांयकाळी आरती होते. दर गुरुवारी नाथांना प्रिय असलेल्या मलिद्याचा नैवेद्य दाखविला जातो. नवनाथ पारायण, धर्मनाथ बीज, रंगपंचमीला समाधी उत्सव साजरा केला जातो. नवसाला पावणारा देव म्हणून मोठी गर्दी येथे होते. निरगुडे घराण्यातील सातवी पिढी नाथांची अखंडसेवा करीत आहेत. कानिफनाथांचे मूळ समाधीस्थान नगर जिल्ह्यातील मढी येथे आहे. परंतु जनकल्याणाकरिता फिरत असताना नाथांनी अंशरुपात स्थान निर्माण केले. अशी अख्यायिका आहे. मंदिरात नाथांच्या लाकडी पादुका, गणेश तांदळा आहे. उत्सवासाठी नवीन चांदीच्या पादुका तयार करण्यात आल्या आहेत. निरगुडे परिवाराकडून चि. ओकार निरगुडे व शशिकांत निरगुडे हे नाथांची नित्यसेवा करीत आहेत.

गेल्या सात पिढ्या निरगुडे घराण्यातील लोक विधीवत पुजा करतात. छोटेखानी मंदिराच्या रुपाने मोठा ऐतिहासिक वारसा जतन करणारे निरगुडे कुटुंबही नाथसंप्रदायाशी जोडले गेले आहे. कानिफनाथ महाराजांची समाधी आणि सोपानदेवांनी समाधीसाठी निवडलेले सासवड याचा काही तरी संबध असावा असा अंदाज आहे. बोपगावच्या डोंगरावरील कानिफनाथ मंदिर सध्या पर्यटक आणि भाविकांचे श्रद्धेचे ठिकाण आहे. रंगपंचमीला येथे मोठी यात्रा भरते. भुलेश्वर डोंगररांगेवरील शेवटच्या टोकावर असलेले चौरंगीनाथांचे मंदिर आणि परिसर तसा दुर्लक्षित आहे. मात्र निसर्गाच्या कुशीत उभे असलेले हे ठिकाण येथील थंडगार हवा आणि याठिकाणाहून पुरंदर आणि दौंड तालुक्याचा दुरपर्यंतचा रमणीय परिसर नजरेस पडतो. चौरंगीनाथाचे हे ठिकाण अगदी उघड्यावर होते. पोंढेगावातील लोकांनी व भक्तांनी येथे मंदिराचे बांधकाम करुन निवारा केला आहे. नाथ संप्रदायाचा वारसा पुढे चालविताना खंड पडला असल्याने या परिसराचा विकास झाला नाही. इतिहास प्रसिद्ध भुलेश्वर मंदिरापासून चौरंगी नाथाचे ठिकाण अगदी जवळ आहे. भुलेश्वर मंदिरातील आखीव रेखीव यादवकालीन शिल्पकला भुरळ घालते. पुण्याचे वेरुळ म्हणून भुलेश्वर मंदिराचा उल्लेख होतो. संत नामदेवांच्या समाधीच्या अंभगात भुलेश्वरचा संदर्भ आहे. संत सोपानदेवांना समाधी दिल्यानंतर संत नामदेव आणि संतप्रभावळ चालत चालत भुलेश्वरी आले. येथे मुक्काम केला आणि दुस-यादिवशी सिद्ध बेटाकडे गेले. असे जुन्या अभंगातून संदर्भ मिळतात.

लोकदेव

महाराष्ट्राचा लोकदेव पंढरीचा विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा आहेत. दोन्ही लोकदेवाची परंपरा भिन्न आहे. खंडोबाच्या भक्तांना वाघ्या व मुरळी म्हणतात. विठ्ठलाच्या भक्तांना वारकरी संबोधले जाते. देहू- आळंदीहून निघालेल्या पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीला पंढरपूरला जातात सासवडहून संत सोपानदेवांची पालखीही दरवर्षी हरिनामाच्या जयघोषात पंढरीला जाते. संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दोन दिवसाच्या मुक्कामी सासवडला विसावतो. येथे संत सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची भेट होत नाही. माऊलींचा सोहळा सासवडला असतानाच सोपानदेव पालखी सोहळा पंढरीला निघतो. माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी दर्शनासाठी सोपानदेव मंदिरात गर्दी करतात.

-हाकाठावर सासवडला संत सोपानदेव महाराजांचा सातशेवा संजीवन समाधीसोहळा साजरा झाला. त्यावेळी वार्तांकनाच्या निमित्ताने सोहळ्यात मलाही सहभागी होता आले. महाविद्यालयात शिकत असताना क-हानदी आणि सोपानदेवांचे मंदिर, संगमेश्वर हे आमचे अभ्यासाची ठिकाणे होती. शाळकरी वयापासूनच सोपानदेवाविषयी कुतुहल होते. -हाकाठचा हा वैभवशाली इतिहास मलाही स्वस्थ बसू देत नव्हता. दैनिक सकाळमध्ये बातमीदारी करीत असताना वार्तांकन करण्याच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर पायी वारी करताना वारकरी संप्रदायाशी मी जोडला गेलो. तशी माझ्या घरी वारीची पंरपरा होतीच. पंढरीच्या वारीची महती हळूहळू कळत गेली आणि मी सुद्धा डोळस वारकरी बनून या सोहळ्यात चालत राहिलो. यातूनच माझ्याकडून वारीच्या वाटेवर या ऐतिहासिक महाकादंबरीची निर्मिती झाली.

बंधूभेट

·       संत सोपानदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पंढरपूरजवळ भंडीशेगाव येथील टप्प्यावर भेट होते. दोन्ही संताच्या पालख्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. सोपानदेव पालखी सोहळा सासवड, परिंचे, नीरा, बारामती, अकलूज मार्गे पंढरपूरला जातो. दुपारी तीन वाजता टप्पा येथे मोठ्या मनोभावे बंधूभेटीचा सोहळा पार पडतो. खरे तर ही बंधूभेट वारक-यांनाही फारसी माहिती नव्हती. नित्या विधी सारखी होती. विठ्ठलनामाचा जयघोष करीत माउलींचा सोहळा दुपारी चार वाजता टप्पा येथे घटकाभर विसावतो. दरम्यानच्या काळात संत सोपानदेवांचा पालखी सोहळा येथे आल्यानंतर दोन्ही सोहळ्यातील मानकरी जमा होता. सोपानदेवांचा रथ थांबवून मानकरी एकमेकांना शालश्रीफळ देऊन भेटतात. यावेळी हरिनामाचा जयघोष होतो. याला बंधूभेट असे म्हणतात. हा बंधूभेटीचा सोहळा मी वार्तांकन करताना दूरपर्यंत पोचविण्यात हातभार लागला. सोपानदेव संस्थानकडून गोसावी कुंटुबातील मानकरी श्रीफळ आणि शालीचा स्वीकार करतात. टप्पा या ठिकाणी जुनाट लिंबाचे झाड असून येथूनच पंढरपूर तालुक्याची हद्द सुरु होते.

 

दशरथ यादव, पुणे

वारकरी सांप्रदायाचे अभ्यासक

मो. ९८८१०९८४८१

वारीचे अंभग

 

वारीचे अंभग

 

समतेचा ध्वज । संतानीच दिला।

ठेवणार नाही। शेवटाले ।।

विठोबा तुमचा। खंडोबा आमचा।

असा नाही भेद। बहुजना ।।

किती सांगू पिढ्या। गेल्या या वाटेने।
सार्थक झालं हो। जगण्याचे।

वारी करा तुम्ही। ऊघडून डोळे।

रानात जागवा। पानमळा।।

शिवारी पंढऱी। मळ्या गोकूळ।

पाटात हो वाहे। चंद्रभागा।

बहरले पीक। फुलला आनंद।

ब्रम्हानंद टाळी। वाजेल बा।

विठ्ठल रखमा। बांधावर ऊभी।

कळस दर्शन। कशासाठी।।

मोट नाडा गेला । वीजपंप आले।
मन सारे झाले। ओले ओले।।

पंढरी जेजुरी। पाहावी एकदा।
असा लोकदेव। नाही दुजा।

वारकरी झाले। जेजुरी पिवळे।
भगवी पताका। भंडाऱ्यात।।

घाटी तुणतुणे। बोलते अंभग।
गर्जतो म्रदंग। येळकोट।।
दुडक्या चालीने। वारकरी चाले।
सावलीचे छत्र। ढगमाझे।।
थकलेले पाय। सरकेना पुढे।

तरी गोड वाटे। पायवाट।।

जड झाले पाय। मन ओढी पुढे।

वार्याची झुळूक। मदतीला।।

हिरवा शिवार। चाले जागवीत।
विठोबाची दिंडी। पंढरीला।।

हरिभजनाने। मंतरलेले रान।

आला बहरुन। भक्तीमळा।।

ऊधळला कोणी। भंडार्याच्या गोणी।
पिवळे पडले। वारकरी।।
मल्हार नगरी। वैष्णवांची दाटी।

भेटीसी हो आले। जगजेठी।।
बाणाई म्हाळसा। हट्ट धरी देवा।

विठोबाच्या भेटी। जाऊ म्हणे।।

खंडोबाचा गड। भजनात दंग।
चढू लागे रंग। सोहळ्याला।।

ठुमकत नाचे। देवाची मुरळी।

भंडारा कपाळी। लावुनिया।।

अहल्या ऊमाजी। पराक्रमी थोर।

होते बंडखोर। पुरागामी।।

सांजवेळी सूर्य। उधळून गेला।
भंडा-याच्या गोणी। वारीवर।।

भारावले देव। बघून सोहळा।
एक कसा झाला। गोतावळा।।

जेजुरीत लोटली। पंढरीची वारी।

मल्हारीच्या दारी। महापूर।।

वारीच्या गावात । शिंपण करते।

हलकी झरते। रिमझिम।।

नाचत गर्जत। आषाढी आभाळ।

वाजवीत टाळ। वारीमध्ये।।

पाऊले चालती। पंढरीची वाट।
जुनी वहिवाट। पुर्वजांची।।

रथाचा कळस। डुलतो हलतो।

दिंड्यात झुलतो। वैष्णव।।

अंधार पांघरी। पालखीचा तळ।

भक्तीचा हल्लोळ। गावामध्ये।।

दगडाचा देव। पुजता कशाला।

ज्याने घडविला। हातजोडा।।

सांगुनिया गेले। ज्ञानदेव तुका।

बोलियेला मुका। वारीमाजी।।

केली कोणी सांगा। मतंराने शेती।
गुगं झाली मती। सनातनी।।

घाम गाळुनिया। फुलला शिवार।

दर्शन हो झाले। विठोबाचे।।

ढोंगी मौनी बाबा। माजलेत फार।

करा त्यांना दूर। वारीतून।।

ऋषीचे ही मूळ। शोधायला हवे।

तपासून घ्यावे। जनमन।।

तुकाराम गाथा। वेदांचाही बाप।
पुराणाची थाप। ऐकूनका।।
पंढरीचा देव। देवांचाही देव।
फुटे कसे पेव। दलालांचे।।

दगडा शेंदूर। फासला हो कोणी।

केला दिनवाणी। देवमाझा।।
नका बोलू कोणी। चमत्काराची भाषा।

उतरले नशा। अभ्यासाने।।
विज्ञान कसोटी। निसर्ग चिकाटी।

ढोंगाला ओहोटी। लागेलबा।।
शिवबाचा किल्ला। मावळा राखतो।

फेकूनिया देतो। अंध्रश्रद्धा।।
जोडोनिया हात। रुखमाई वरा।
मिळेल सहारा। सत्याचाच।।

संपत्ती जमवी। फसवून जना।

लाज वाटो मना। दुबळ्यांच्या।।

करी भ्रष्टाचार। आतल्या हाताने।
जाईल फुकाने। जन्मअसा।।
कष्टाविना जेव्हा। मिळते भाकर।

होईल चाकर। मनोमनी।।

चोरुनिया अंग। किती नासवाल।

स्वतः फसवाल। स्वतःलाच।।

संपत्ती कुणाची। शेवटाले गेली।

कुबेराची आली। आठवण।।

उत्तम व्यवहारे। कमवावे धन।

होई समाधान। कष्टाचेच।।

गुलामी सोडून। माणूस वागेल।

तेव्हांच येईल। स्वराज्य।।
पंढरीत विठ्ठल। भेटतच नाही।

हिरव्या शिवारी। राहतोबा।
राही रुखमाई। विनवती देवा।
भक्ताच्या गावा। चलाजाऊ।।
ज्ञानोबा तुकोबा। मंत्र हा जपावा।

अधर्म कापावा। विचाराने।।

नामदेव जना। बोलते अभंग।

नाचतो मृदंग। ठायीठायी।।

नाचतो श्रीरंग। नदीकाठी।।
आषाढाची वारी । आनंदी सोहळा।
जमे गोतावळा। माणसांचा।।
पंढरीत काय। वाजत गाजत।
पताका नाचत। डोलेकैसी।।
पंढरी नामाचा। महिमा आचाट।

होई घबराट। स्वर्गातच।।

जादूमंत्र टोणा। नाही चालणार।
सत्याचा आधार। विठूमाझा।।
विठू नाम घेता। फिरेल माघारी।
यमाची वरात। दारातून।।
कौशल्येचा राम। यशोधेचा कान्हा।

पंढरीचा राणा। एकअसे।।

विठ्ठल सावळा। गोकुळी यादवा।

मनात जागवा। कष्णसखा।।

छत्रपती शिवा। गोकुळी यादवा।

पंढरीत पावा। विठोबाचा।।

 करी कशासाठी। गौतमाचा धावा।

मराठ्यांचा छावा। शोधलावा।।

संभाजी राजांनी। अनुदान दिले।

पंढरीला नेले। बहुजना।।

चोराच्या हाती । खजिन्याची चावी।
इतिहास खोटा। घुसडला।।

तळव्याने गेले। सूर्य झाकायला।

लागे वाकायला। सनातनी।।

वारकरी धर्म। वेगळाच आहे।
वळुनिया पाहे। बहुजना।।

महानुभाव शीख। तसाच वैदिक।
वारकरी हाच। शिवधर्म।।
सत्याचा हो शोध। घेतला संतानी।

टाकली पंतानी। मानबघा।।।
भागवत धर्म। आपला वाटला।
कुणी बाटवला। हिंदूधर्म।।

जगण्याचे बळ। विठोबाने दिले।

नाचवत नेले। पंढरीला।।

काळा काळा देव। आहे बहुजना।

गोरा गोरा पान। वैदिकांचा।।
जानवे घालून। बाटू देवू नका।
तोडोनिया टाका। विषमता।।

स्वार्थासाठी भट। देवाला बाटवी।

नदीला आटवी। आभासाने।।

कधी तरी जाणा। पावसाचं गाणं।

आभाळाचं कान। करुनिया।।

विठ्ठलाने मला। आहे सांगितले।

सत्य वारीतले। लिहायला।।