Popular Posts

Monday, July 15, 2013

मराठे म्हणजे यादव?

मराठे म्हणजे यादव?
- डॉ. सदानंद मोरे
(सौ .साप्ताहिक सकाळ )
प्रत्येक प्रांत आणि तेथील घराणी यांचा उल्लेख इतिहासात डोकावता अनेकदा केला जातो. राजारामशास्त्री भागवत यांनी त्यांच्या साहित्यातून दक्षिणेकडच्या यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात महाराष्ट्राचा यदुक्षेत्र असा उल्लेख आल्याने संदर्भांना वेगळे वळण मिळू शकते.
शिखरशिंगणापूरचा श्रीशंभुमहादेव हा डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेला ग्रंथ एका महत्त्वाच्या कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. एका कुलदैवताच्या माध्यमातून कुलाचा, कुलसमूहाचा आणि त्याच्या प्रादेशिकतेचा शोध डॉ. ढेरे या ग्रंथातून घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुळ राजस्थानातील शिसोदिया राजपुतांमध्ये न शोधता दक्षिणेतील होयसळ यादवांमध्ये या कुळाचे मूळ शोधण्याचा त्यांचा महाप्रकल्प आहे. ढेरे यांच्या प्रस्तुत ग्रंथामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दक्षिणायनाला चांगलीच गती मिळाली आहे.
परंतु खुद्द यादवांच्याच मुलाबद्दल ढेरे यांच्या लेखनात पुरेशी स्पष्टता नाही. पशुपालक गोपजनांसाठी प्रचलित असलेला व प्रतिष्ठित झालेला “यादव’ हा कुलवाचक शब्द म्हणजे एक मोठे कोडेच आहे. डॉ. ढेरे विशेषतः दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर घडून आलेल्या यादवीकरणाकडे लक्ष वेधतात. हे यादवीकरण क्षत्रियीकरणही आहे. या प्रक्रियेचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न ढेरे करतात.
ढेरे यादव कुळाच्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नसले, तरी काही प्रसिद्ध गोष्टींचा उल्लेख आपोआप झालेला आहे. यादव कुळातील अवतार मानला जाऊन सर्वाधिक मान्यता मिळालेला श्रीकृष्ण आणि ज्याचे नाव “यादव’ शब्दातच अनुस्यूत आहे, तो यदू. यदू, यादव आणि यादवकुलकौस्तुभ कृष्ण यांच्याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. वायू, विष्णू, ब्रह्मांड यांच्यासारख्या पुराणांमधून, महाभारतामधून आणि महाभारताचेच खिल पर्व अर्थात परिशिष्ट मानल्या गेलेल्या हरिवंशपुराणामधून याविषयी वाचायला मिळते. त्यातील सर्वश्रुत व सर्वपरिचित वर्णनानुसार यदू म्हणजे ऐल वंशातील ययातीला शुक्राचार्यकन्या देवयानीपासून झालेला पुत्र, आणि या यदूचे वंशज म्हणजेच यादव. या यादवांची अनेक कुले असून, मथुरा ही त्यांच्या राज्याची राजधानी. मगधाच्या विस्तारवादी सम्राट जरासंधाने मथुरेवर वारंवार आक्रमणे केल्यामुळे कृष्णाच्या सल्ल्यानुसार यादवांनी आपली राजधानी पश्‍चिम किनाऱ्यावरील द्वारका या बंदरात हलविली.
उत्तरेतील हे यादव दक्षिणेत पसरले, असा आणखी एक समज उपरोक्त साधनांच्या आधारे रूढ झालेला आहे. त्यानुसार विदर्भातील राज्य हे याच यादवांच्या एका शाखेचे असून, येथे राज्य करणाऱ्या भीष्मक नावाच्या राजाची कन्या रुक्‍मिणी म्हणजेच श्रीकृष्णाची पत्नी. रुक्‍मिणीने द्वारकेच्या कृष्णाला मनोमन वरले होते, परंतु तिचा भाऊ रुक्‍मी याला हा संबंध मान्य नसून, त्याने रुक्‍मिणीचा वाङ्‌निश्‍चय परस्पर चेदी देशाचा राजपुत्र शिशुपाल याच्याशी करून टाकला होता. परंतु रुक्‍मिणीने कृष्णाला पत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले व कृष्णाने लग्नाच्या दिवशीच तिचे हरण केले, ही रुक्‍मिणी स्वयंवराची कथा लोकप्रिय आहे. आता हा शिशुपाल तरी कोण? चेदी देशाचा राजा दमघोष याला झालेला, श्रीकृष्णाच्या श्रुतश्रवा नामक एका आत्याचा मुलगा. एवढे सारे जवळचे नातेसंबंध असूनही भीष्मक, रुक्‍मी, शिशुपाल ही मंडळी कृष्णाला व त्याच्या शाखेला कमी समजून त्यांच्याकडे तुच्छतेने बघायची. पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या प्रसंगी तर शिशुपालाने कृष्णाचे निंदासत्रच सुरू केले. शेवटी कृष्णाने त्याचा तेथेच सुदर्शनचक्र सोडून शिरच्छेद केला, इ. कथाभाग आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. पण त्यात यादव मूळचे उत्तरेतील, शूरसेन मथुरा प्रदेशातील व तेथून दक्षिणेकडे आले, असे आपणही गृहीत धरलेले असते. डॉ. ढेरेही या कौलिक व्यवहारातील बारीकसारीक तपशील देण्याच्या भानगडीत पडत नाहीत; पण यादव मुळातले दक्षिणेतले गोपजन ऊर्फ पशुपालक असे मानण्याकडे त्यांचा कल दिसतो. निदान दक्षिणेतील अनेक गोपजनांचे यादवीकरण झाले. त्यांचा उत्तरेतील यादवांशी साक्षात संबंध लावण्याची जरुरी नसल्याचेही त्यांच्या लिखाणातून ध्वनित होते.
यादव हे मुळातले दक्षिणेतले. त्यांचे राज्य प्रबळ झाले ते महाराष्ट्रात आणि तेथून ते भारतात अन्यत्र पसरले. महाराष्ट्र हे मुळातले यदुक्षेत्र आणि महाराष्ट्रातील शिवछत्रपतींसह सर्व मराठे यादवच, अशी भूमिका कोणी मांडली तर? परंतु असा भविष्याभिमुख उत्तराची अपेक्षा करणारा प्रश्‍न विचारायची आवश्‍यकताच नाही. ही भूमिका मांडली आहे राजारामशास्त्री भागवत यांनी. “यदुक्षेत्रात ब्राह्मणांचा प्रवेश’ या पुस्तकात भागवतांनी रामायण, महाभारत, पुराणादी पारंपरिक वैदिक साधनांच्या आधारेच या अभिनव आणि उलथापालथ करणाऱ्या क्रांतिकारक शोधाची मांडणी केली आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासातील दक्षिणी पक्षाच्या पुरस्कर्त्यांनी त्याकडे नीट लक्ष दिलेले दिसत नाही.
महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा इतिहास सिद्ध करताना राजारामशास्त्र्यांनी भाषिक पुराव्याचा आणि भाषाशास्त्रीय पद्धतीचा भरपूर उपयोग केला, हे आपण जाणतोच. शास्त्रीबुवांचा वैदिक परंपरेतील सर्व प्रकारच्या संस्कृत शास्त्रीय व ललित ग्रंथाचा व्यासंगही पक्का होता. त्याचा उपयोग त्यांनी यादवांचे कोडे सोडविण्यासाठी करून घेतला.
व्यक्तींना ओळखण्यासाठी बालपणीच त्यांचे नामकरण केले जाते, परंतु भाषेत व्यक्ती तितकी नावे उपलब्ध नसल्यामुळे एकच नाव अनेक व्यक्तींना ठेवले जाऊ शकते. विशेषतः एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात डोळ्यांत भरण्यासारखा पराक्रम केला, प्रसिद्धी मिळवली तर तिचे नाव आपल्या अपत्यांना ठेवण्याची जणू लाटच येते. यात तत्त्वतः गैर असे काहीच नाही; परंतु कालांतराने नावांतील साम्यामुळे व्यक्तीव्यक्तींमध्ये घोटाळा होऊ शकतो व त्याचा परिणाम इतिहासलेखनावर होऊ शकतो. एकाचे श्रेय दुसऱ्याला, तर दुसऱ्याचा पराक्रम तिसऱ्याच्या नावावर, असा गोंधळही त्यातून निष्पन्न होतो. तसेच, काळ जेवढा प्राचीन तेवढी ही घोटाळा होण्याची शक्‍यताही अधिकच. असाच काहीसा प्रकार भागवतांच्या मते, यादवांचा आद्य पूर्वज यदू याच्या बाबतीत घडलेला आहे.
रावणाची कुम्भीनसी नामक (सावत्र) बहीण होती. ती म्हणजे माल्यवान राक्षसाची कन्या अनला हिला विश्‍वावसू राक्षसापासून झालेली मुलगी. तिच्या आईचे नाव सुंदरा. या कुम्भीनसी नावाच्या कन्येचे मधू दैत्याने हरण करून तिच्याशी लग्न लावले. या दांपत्याला लवण नावाचा पुत्र व मधुमती नावाची कन्या, अशी अपत्ये झाली. याच लवणासुराचा वध रामाचा भाऊ शत्रुघ्नाने केला व त्याच्याच मधुवनात मधुरा नावाची नगरी वसवली.
इकडे मधुमतीचा विवाह ईक्ष्वाकू कुलातील हर्यश्‍व नावाच्या राजाशी झाला. हर्यश्‍व आणि मधुमती यांना जो मुलगा झाला, त्याचे नाव यदू. या यदूने एका नागकन्येला वरले.
नाग शब्दाची शास्त्रीबोवांनी दिलेली व्युत्पत्ती चिंतनीय आहे. नग (न जाणारा, स्थिर) म्हणजे डोंगर. अशा डोंगराळ प्रदेशात राहणारे ते नाग. आता या यदूच्या कुलाचा म्हणजे दक्षिणेतील यादवांच्या वंशाचा नकाशा भागवतांच्याच शब्दांत काढायचा झाला तर “”यदूचा बाप ईक्ष्वाकू वंशातला व आई दानवी व आईची आई राक्षसी. त्याच्या मुलाचे आजोळ नागांच्या राजाकडचे.” याशिवाय याच काळात दक्षिणेत वास्तव्य करून असलेल्या वानरांचीही या यादव कुळात सरमिसळ झाली असण्याची शक्‍यताही ते सूचित करतात.
यदूच्या वंशात जन्माला आलेला कृष्ण हा आणखी एक पिढी मागे गेले असता मधूच्या गोत्रातला ठरतो, म्हणून त्याला माधव असे म्हटले असल्याचे भागवत स्पष्ट करतात.
साऱ्या विवेचनाचा इत्यर्थ भागवतांच्याच शब्दांत सांगायचा झाल्यास असे म्हणता येते, की “”यदूंची आद्य भूमी द्रविड होय. “मधुरा’ हा अस्सल शब्द त्यामधील एका नगरीसच लावला जातो. सिंहल द्वीपातील “मतुरा’ व यमुनेवरील “मथुरा’ हे “मधुरा’ या शब्दाचे जसजसे यादव पसरत गेले, तसतसे अपभ्रंश झाले.”
उत्तर आणि दक्षिण येथील स्थळांची आणि नद्यांची उलटापालट हा भागवतांच्या एकूणच पद्धतिशास्त्राचा भाग आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातील गोदावरी या नावाने ओळखली जाणारी नदी हीच खरी किंवा मूळ गंगा. याच गंगेच्या तीरावर प्रतिष्ठान किंवा पैठण नगर वसले होते. उत्तरेतील भागीरथी या नदीला याज्ञिकांनी “गंगा’ हे नाव दिले व गंगा-यमुनेचा संगम जेथे होतो, तेथे प्रतिष्ठान ओढून आणले.”
“जे गोप तेच गुर्जर व तेच यादव’ असा राजारामशास्त्र्यांचा सिद्धान्त आहे. हे “गोप मूळचे दाक्षिणात्य असून, गोपकुलात जन्म घेणारा कृष्णही दाक्षिणात्यच,’ ही त्याची पुढची निष्पत्ती आहे. या यादवांची मूळ भूमी अर्थातच मधुवन आणि त्यांच्या मूळ पूर्वज यदू मधुमतीचा पुत्र. असे असताना परंपरा यदूला ययातीचा पुत्र का मानते, याचे स्पष्टीकरण शास्त्रीबोवांच्या शब्दात देणे अधिक उचित होईल.
“”एकदा पृथ्वी परशुरामाने निःक्षत्रिय केली व निःक्षत्रिय झाली असता, ती पुन्हा एकदा-दोनदा नव्हे, तर बरोबर वीस वेळा आणखी निःक्षत्रिय केली व याप्रमाणे त्रेतायुगातच बरोबर एकवीस वेळा निःक्षत्रिय झाली असतानाही नंदाने एका क्षत्रियापासून शूद्र जातीच्या स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन ती कलियुगात पुन्हा निःक्षत्रिय केली व नंदाबरोबर सर्व क्षत्रिय जमात लयास गेली. अशा प्रकारचे पूर्वापार विरोधी लेख लिहिणाऱ्या बराह्मण पौराणिकांनी जर निःशेष यदुवंशाचा लोप करून टाकिला किंवा तो वंश दाक्षिणात्य असतानाही आपल्या गुरुतल्पव्यसनी राजाचे माहात्म्य वाढविण्यासाठी त्यास ययातीचे पुत्रत्व दिले तर त्यात आश्‍चर्य ते कोणते?”
शास्त्रीबोवांनी ब्राह्मण पौराणिकांवर गंभीर आरोप केले आहेत. वस्तुतः पुराणांची रचना करायचे काम सूत नावाच्या वेगळ्याच जातीचे होते. पार्गिटर या पाश्‍चात्त्य संशोधकाच्या मते, मुळात सुतांची निर्मिती असणाऱ्या पुराणांवर कालांतराने ब्राह्मणांनी हात फिरवला व त्यात आपणास अनुकूल असे बदल केले.
भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासलेखनातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची भूमिका समजावून घेतल्याशिवाय हा इतिहास आकलनकक्षेत येणे अवघड आहे. “सह्याद्री’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक स. आ. जोगळेकर उलट क्षत्रियांनीच पुराणात फिरवाफिरव केली, असा प्रत्यारोप करतात. आता काही जैन ग्रंथांमध्ये क्षत्रियांची बाजू घेऊन ब्राह्मणांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झाले, हे खरे आहे. कार्तवीर्याचा पुत्र सुभूम हा जैनांचा आठवा चक्रवर्ती. त्याने परशुरामाचा वध केला आणि पृथ्वी एकवीस वेळा निर्ब्राह्मण केली, अशी एक कथा स्वतः जोगळेकरच जैन ग्रंथांच्या आधारे सांगतात. परंतु असा काही प्रकार वैदिक परंपरेतील पुराणांमध्ये घडला असल्याचे ते जोपर्यंत दाखवू शकत नाहीत, तोपर्यंत त्यांचा हा दावा पोकळच राहील. रामाने व भीष्माने परशुरामाचा पराभव किंवा तेजोभंग केल्याच्या कथा अनुक्रमे रामायणात व महाभारतात आढळतात. त्या बनावट असून, क्षत्रियांनी रचल्याचे जोगळेकर सूचित करतात. मात्र त्यासाठी ते कोणताही पुरावा देऊ शकत नाहीत. परशुरामाच्या विरुद्ध जे काही लिखाण आढळते, त्यात अलीकडील जोतिराव फुल्यांपासून का. बा. देशमुखांपर्यंतच्या ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखनाचा समावेश आहे. ते सर्वथा प्रतिक्रियात्मक आहे. राजारामशास्त्री स्वतः ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर इतरांप्रमाणे ब्रह्मद्वेषाचा आरोप करता येत नाही. त्यांनी अत्यंत प्रांजळपणे सांगितले आहे, की विसंगती आणि अतिशयोक्ती यांनी युक्त असलेली परशुरामकथा ब्राह्मणांनी आपले माहात्म्य वाढवण्याच्या उद्देशाने तयार केली. एरवी संख्या आणि बळ यांचे बाहुल्य असलेल्या क्षत्रियांचा एकवीस वेळा निःपात करणे अशक्‍यप्रायच म्हटले पाहिजे.
परशुरामकथेचा मुद्दा यासाठी प्रस्तुत ठरतो, की भारताच्या इतिहासात जातीय गुंतागुंत किती आहे, हे लक्षात यावे. अशीच वांशिक गुंतागुंतही आहेच. आर्य आणि द्रविड हे प्रकरण याच गुंतागुंतीचा एक भाग. राजारामशास्त्र्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन या गुंतागुंतीचे अवघड पदर उलगडण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रासह दक्षिण अथवा द्रविड देश हीच यदूची व म्हणून यादवांची मूळ भूमी असून, इथूनच यादव भारतात अन्यत्र पसरले. या भूमीला ते यदुक्षेत्र असे नाव देतात. आणि मुख्य मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील मराठे म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून, यादवच होत. भागवतांनी केलेली इतिहासाची आणि भूगोलाची ही उलथापालथ अभूतपूर्वच म्हणायला हवी.
मात्र राजारामशास्त्र्यांनी केलेली ही उलथापालथ केवळ काल्पनिक आहे, असे म्हणता येणे कठीण आहे. त्यांना पाठबळ देणारे आणखी उल्लेख सापडू शकतात. कृष्णाच्या एका पत्नीचे नाव जांबुवती असे असून, ती जांबवान या अस्वलांच्या राजाची कन्या असल्याचा समज आहे. त्याचा अर्थ अस्वल हे देवक किंवा प्रतीक किंवा ध्वजचिन्ह असणारी वन्य जमात, असा घेता येतो. या जांबुवतीपासून कृष्णाला झालेल्या मुलाचे नावच मुळी द्रविड. विशेष म्हणजे कृष्णाशी कुस्ती करणारा त्याचा हा सासरा रामावतारातील जांबुवानाचा अवतार किंवा तत्सम कोणी असल्याचाही समज आहे. आता हा जांबवान दक्षिण देशातीलच होता, हे वेगळे सांगायला नको. थोडक्‍यात, यादवांची पाळेमुळे दक्षिणेत पसरलेली दिसतात, ती अशी. यादव जसे प्रसरणशील तसेच मराठेही, असे भागवत ठामपणे सांगतात.

No comments: