Popular Posts

Friday, August 2, 2013

चोरटा पाऊस

चोरटा पाऊस

नको तिथेच झोंबला
असा पाऊस चोरटा
बघा टपून बसला
हा हा नभाचा पोरटा

ढग चालता बोलता
बघा आडले घरात
ताटी मनाची लावता
उभा पाऊस दारात

छत अंगाव घेऊन
वळचणीला लोंबला
मऊ शिंतोडे बनून
हळू घरात घुसला

भल्या पहाटे पहाटे
आडावरती लपला
हंडा भरता भरता
दव बनून खेटला

भर दुपारी बागेत
त्याने बंगला बांधला
मग सखीला बघून
हळू फांदीशी झिंगला

नाग पंचमी सणाला
झिम्मा सईशी खेळला
पिंगा घालता घालता
गडी गर्दीत घुसला

पा णी अडवा जिरवा
असा पुढारी बोलला
माळ बोडका बघून
गाली पाऊस हसला

मेंहदी हाताला बघून
पाऊस डोळ्यात दाटला
मग मु-हाळी बनून
असा एकांटी भेटला

टाळमृदंग वाजता
भक्ती रसात भिजला
झेंडा भगवा घेऊन
असा दिंडीत नाचला

माठ फो़डीला कृ्ष्णानं
करी गवळण कागांवा
पेंद्या हसत म्हणाला
जावा शरण यादवा


दशरथ यादव, पुणे

Thursday, August 1, 2013

संमेलनाध्यक्ष यादव यांचे भाषण


राज्यस्तरीय
लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन
संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे भाषण
------------------------

बंधु व भगिनीनों
सर्वांना सप्रेम जय जिजाऊ...  

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने होणा-या पहिल्या राज्यस्तरीय शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड करून शेतक-याच्या मुलांचा सन्मान केला त्याबद्दल साहित्य परिषदेच्या राज्यातील सर्व पदाधिकारी, साहित्यिक व हितचिंतकाचे मनापासून आभार मानतो.
शेतक-याने फक्त नांगर धरून मातीत घाम गाळावा, त्याने लेखणी हातात धरू नये असे सांगणारी भाकाड पुराणाचे रक्षकांना शेतातही साहित्य फुलते याची कदाचित जाणीव नसावी. पण साहित्याचा खरा उगम हा शेताशिवारात आणि कष्टकरी कुणब्यांच्या घामातून झाला आहे. माझ्या सारख्या जन्मताच शेती व मातीची नाळ जोडून रानमातीत कष्ट करणारा..शेतकरी कुटुंबातील धडपड्या..शालेय शिक्षणानंतर माझ्यातील बंडखोर वृतीला चालना मिळाली. बारमाही कष्ट करून वर्षे पुरेल एवढी चंदी मिळेल की नाही याची खात्री नसायची..पण काळ्या आईची सेवा आईबा प्रामाणिकपणे करायचे...घाम गाळल्यानंतर काळी आई एकदा तरी ओ देईल यावर त्यांची ठाम विश्वास होता.
.. आणि व्हायचेही तसेच...मुठीनं पेरलं तर खंडीने पिकायचे. याच मातीत माझी साहित्याची बीजे रुजली आणि मग ती क-हेच्या काठावर बहरत बहरत मराठी भाषेच्या जगतात पोचली. शेतक-याचा मुलगा लेखक, पत्रकार, कवी, साहित्यिक, झाला. प्रस्थापित नाकेमुरडून कौतुक करायचे. समजायचे पण.मनातील बंडखोर वृत्ती स्वस्थ बसू देत नव्हती. कुठे तरी बळीराजाची संस्कृती पुन्हा या देशात रुजायाला हवी, काळ्या शिवारात पुन्हा बु्द्धांचा विचार हसायला हवा...जुने ते सोनं ही म्हण पुन्हा सिद्ध करण्यासाठी मन सैरावैरा फिरु लागले..दोन दशकाचा परिवतर्नाचा अनुभव पाठीशी घेत घेत साहित्य लेखनाला धुमारे फुटले..आज लोक स्वाकरतात, पण त्यामागची तपश्चर्या, त्याग, कष्ट,जिद्द, चिकाटी, कीती महत्वाची होती ते कळते. गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर, गवताच्या कुंद्यावर, पानाच्या बुंदावर, फुलाच्या गंधावर, ज्वारीच्या कणसावर...घामाच्या थेंबावर...साहित्य निर्माण झाले.

कृषी संस्कतीमधील वास्तव जीवन व तंत्रज्ञानावर आधारित शेतीचे महत्व साहित्यात आले तरच जगाच्या बाजारात शेतकरी प्रगती करु शकतो. मातृसत्ताक व कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेल्या समाजाचे वास्तव चित्रण आजपर्यंत साहित्यात हवे तेवढे उतरले नाही.
 कथा व कल्पनात लेखक साहित्यिक रमल्याने कृषी साहित्य परिपूर्ण झाले नाही. पुरोगामी चळवळीचा वारसा असणारे, ग्रामीण, शहरी साहित्याने वैचारिक मंथन करण्याचे काम केले. मात्र कृषी साहित्य त्यांच्यापासून दूर राहिले. कथा, कल्पना, नाट्य मनोरंजनात्म साहित्य लिहिणा-यांकडून वास्तव लेखन झाले नाही. ही खरी शोकांतिका आहे.
हरितक्रांतीच्या पाच कलमी कार्यक्रमाने शेती, सहकार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला. शेतीत अमूलाग्र बदल झाला त्याचा वेद साहित्याने घेतला नाही. अजूनही जुन्याच पद्धतीचे ग्रामीण जीवन साहित्यातून मांडणारे, लेखक, कवी यांनी वास्तव समाजजीवन साहित्यातून जपावे.
 प्राचीनकाळी नदीच्या काठावर मातीत बियाण्याची पेरणी करणारी, निरुती या महिलेच्या नावाने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शेती शिवाराशी नाते जोडून जीवन जगणारी इथली माणसे
हजारो वषे राबराब राबतात. पण त्यांची वेदना साहित्यात किती आली, याचा विचार करणे गरजेचे आहे. बळीराजाशी नाळ असलेला इथला शेतकरी काबाड कष्ट करीत राहिला, प्रामाणिक शेतक-यांच्या भावनेचा बाजार मांडून धर्माची खोटी अस्मिता त्यांच्यावर लादून देवाधर्मा्च्या नावाखाली वैदिक परंपरा जोपासणा-यांनी पिळवणूक केली.
सत्याचा मागोवा घेणारा शेतकरी कायम सत्यापासून कोसोमेल दूर राहिला. प्रंचंड बुद्धीमत्ता, लढाऊ वृत्ती व मुक्या मातीला बोलते करण्याची जबरदस्त ताकद असणारा मूळनिवासी कुणबी विकासापासून दूर राहिला. निसर्गाच्या लहरीपणाला कवेत घेत शेतीत सोनं पिकवणारा खरा बळी पाताळात घालण्याचे काम इथल्या पुराणमतवाद्यांनी आज सुरु ठेवले आहे. शेतीमातीशी नाळ असणारे लोक लिहू लागले आहेत. नव्या साहित्याचा वेद घेण्याचा त्यांचा जोष पुन्हा बळीराज्य आणण्याचे एक पाऊल आहे. असेच म्हणावे लागेल. समाजात सगळ्या गोष्टींना प्राधान्य देवून त्याचा गवगवा केला जातो. पण शेतक-यांची नेमकी सल काय आहे, याचा वेद घेण्याचा प्रयत्न फार थोड्या साहित्यिकांनी घेतला. लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करता सत्तर टक्के शेतीवर जगणा-या या कुणबी समाजातील कीती लोक लिहितात. हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. सध्याच्या काळात ग्रामीण, दलित, भटक्या, प्रबोधन करणा-या साहित्य चळवळी पुढे येत आहेत.
लोकांना प्रेरणा देणारे, जगण्यात आनंद निमार्ण करणारे साहित्य समाजाला पुढे नेवू शकते.
साहित्याचा व आमचा काही संबध नाही, अशीच भावना सनातनी लोकांनी रुजवली. भाकड पुराणकथा सांगून भटांनी समजात दरी पाडली.-
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर || होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा || खंडोबा, जोतिबा || महासुभा ||१||
सद्गुणी पुतळा राजा मुळ बळी || दशहरा, दिवाळी ||आठविती ||२||
क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ || बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||
आर्य भट आले, सुवर्ण लुटिले || क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||
वामन का घाली बळी रसातळी || प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||

महात्मा फुले यांनी शेतक-यांचा आसूड सारखा ग्रंथ लिहून वेदना मांडली. ग्रामीण जीवनावर झोंबी़ कांदबरी लिहिणारे, प्रा. आनंद यादव असो नाही तर रानातल्या कविता लिहिणारे ना.धो महानोर, विठ्ठल वाघ असो. बारोमास सारखी कांदबरी लिहिणारे सदानंद देशमुख यांनी काही प्रमाणात शेतीविषयी लोकांच्या कुतूहल जागे करण्याचा प्रयत्न केला.


कृषी साहित्य लेखनाचा इतिहास
-------------------------------------
येडागबाळा शेतकरी त्याच्या
दिसण्यावर नका जाऊ
शहरामधले कोणते मशीन
धान्य पिकवते भाऊ...
असा प्रश्न करणारी कल्पना दुधाळसारखी नव्या पिढीतील कवयित्री असो.

जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपाशी आहे. त्याच्या जीवनमानाकडे कोण पाहतो.
शेतक-यांच्या दाणापाण्याला हात लावला तर मुलाहिजा पाळणार नाही. अशी सक्त ताकीद सैन्यांना देणारे छत्रपती शिवाजी महाराज कोठे...दुष्काळात शेतक-यांचे कर्ज माप करणारे संत तुकाराम महाराज कुठे...देशातील शेतक-यांचे कर्जमाप करुन त्यांना नवीन उद्योगाची दालने उघडून देणारे लोकनेते शरद पवार कोठे...तर कुणब्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारुन त्यांना मनुवादी गुलामीतून मुक्त करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर कुठे....
साहित्याच्या गोंडस नावाखाली सरकारी पैशाची लयलूट करणारे सनातनी साहित्यिक मिरवीत आहेत. याचा आता उबग आला आहे. ग्रामीण, दलित, भटके, सोशितांवर लेखन करणारे सगळे एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय करण्याची गरज आहे.
साहित्य हाच समाजाचा आरसा असतो. समाजात होणा-या सगळ्या घटनांचा लेखाजोखा साहित्यात येण्याची गरज असताना, येथील मुळनिवासी 90 टक्के लोकांची मूळ बोली भाषा सोडून चार टक्के लोकांची भाषा समाजावर लादून त्यांना अडाणी, अज्ञानी ठरवणे हा प्रकार हजारो वषे सुरू आहे.

Tuesday, July 23, 2013

पुरंदरचा किल्लेदार: DasharathJi_Yadav.flv

पुरंदरचा किल्लेदार: DasharathJi_Yadav.flv

Tuesday, July 16, 2013

नमस्कार साहित्यप्रेमी रसिकहो




नमस्कार साहित्यप्रेमी रसिकहो ,
यावर्षीचे ८७  वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे होणार आहे. साहित्य महामंडळाने यापूर्वी पार पडलेलेया संमेलनाला कायम वादाची किनार होती. छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुरंधर किल्ल्याच्या साक्षीने साहित्य संमेलन होणार आहे . करहाकाठावर होणाऱ्या समेलानाबाबत आपल्या अपेक्ष्या कळवाव्यात… त्या संयोजकापर्यंत पोचवल्या जातील …जेणेकरून संमेलन वादाशिवाय व ऐतिहासिक होईल . पुरंदरला साहित्याचा  मोठा वारसा आहे, छत्रपती संभाजी महाराज, संत सोपानदेव, महात्मा फुले, आचार्य अत्रे , सगनभाऊ, होनाजीबाळा , यशवंतराव सावंत आदी ,

दशरथ यादव , पुणे (सासवड )
उपाध्यक्ष - महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड

Monday, July 15, 2013

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…
- डॉ. सदानंद मोरे



”मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्‍य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून व महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास.”
इतिहासाचार्य राजवाडे राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या राष्ट्रकल्पनेची व्याप्ती हिंदुस्थानशी समकक्ष नसून, महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. मराठ्यांनी हिंदुस्थानभर साम्राज्य स्थापणे, हे त्यांना नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसे. युरोपभर आपले साम्राज्य करु इच्छिणारा नेपोलियन त्यांना “बदनजरेचा पाजीतला पाजी राक्षस’ वाटे. ज्युलियस सीझर, तैमूर इत्यादींसारख्या अशाच साम्राज्येच्छूंचा त्यांना तिटकारा होता. इतकेच नव्हे, तर श्रीरामदास व श्री शिवाजी यांनी स्वराज्य स्थापिल्यावर बाजीरावादी मंडळींना सर्व हिंदुस्थानभर नव्हे, तर संपूर्ण दुनियेपर्यंत राज्य स्थापण्याची दुष्ट व अन्याय्य बुद्धी झाली,” असे ते म्हणत.
राजवाड्यांना संघराज्याच्या – णपळींशव डींरींशी चा पर्याय न्याय्य वाटे. मराठ्यांना “णपळींशव डींरींश स्थापण्याची न्याय्य बुद्धी झाली नाही. त्यामुळे रजपूत, रांगडे, पंजाबी, गुजराती, काठी, कानडी, तेलगू, मल्याळम, मुसलमान अशी हिंदुखंडातील सर्व राष्ट्रे व लोक मराठ्यांच्या विरुद्ध होऊन पानिपत येथे भिकार अबदालीकडून पराभव झाला. अशी त्यांची पराभवमीमांसा होती.
राजवाडे भाषावार आणि संस्कृतीवार राष्ट्रांच्या निर्मितीचे पुरस्कर्ते असून, अशा राष्ट्रांची लीग, कॉन्फिडरसी वा युनियन व्हायला त्यांची हरकत नाही. महाराष्ट्राने राष्ट्र व्हावे आणि हिंदुस्थानच्या संयुक्त संस्थानांचे धुरीणत्व करावे, अशी त्यांची कल्पना दिसते.
”इंग्रज, अंग्लोइंडियन्स, पारशी, ज्यू, लिंगायत, मानभाव, महार, शूद्र, मराठे, कातकरी, मुसलमान, गुजराथी, मारवाडी, जैन, ब्राह्मण व सुधारक यांपैकी महाराष्ट्र कोणाचे? एकेकाचे की साऱ्या मिळूनचे? साऱ्या मिळूनचे म्हटले तर उत्तर एक येणार नाही. एकेकाचे म्हटले तरी उत्तर एक येणार नाही, हे ठरलेलेच.”
याही पुढे जाऊन राजवाडे असे विधान करतात, की “”बहुतम व जुनाट जे हिंदू त्यांचे महाराष्ट्र म्हटले तत्रापिही ही एकच एक उत्तर येणे अशक्‍य आहे.”
याचा अर्थ असा होतो, की सर्वसाधारण हिंदूला महाराष्ट्राच्या ऱ्हासाची जाणीव होईलच, असे नाही. म्हणजेच राजवाडे शिवसेनेप्रमाणे महाराष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यांच्यात अनिवार्य संबंध मानायला तयार नाहीत.
राजवाड्यांचा वर्चस्ववाद
राजवाड्यांचे असे मत आहे, “”फक्त ब्राह्मण व मराठे यांच्या दृष्टीला राष्ट्राचा ऱ्हास झालेला दिसेल. अन्य कोणाच्याही दृष्टीला ऱ्हास दिसणार नाही. कित्येक तर प्रगती चाललेली आहे, असेच म्हणतील. … दोन्ही प्रश्‍नमालिकासंबंधाने फक्त ब्राह्मण व मराठे यांची बरीच एकवाक्‍यता होईल. इतरांचे हितसंबंध, आकांक्षा, भविष्य व उमेद अगदी निराळी. त्यांची उत्तरे ब्राह्मणमराठ्यांच्या उत्तराहून अगदी उलट येणार, यात संशय नाही. खंगले कोण? तर ब्राह्मण-मराठे. स्वराज्य व साम्राज्य गेले कोणाचे? तर ब्राह्मण मराठ्यांचे. पोटभर भाकरी मिळत नाही कोणाला? तर ब्राह्मण मराठ्यांना. शरीराने क्षीण कोण? ब्राह्मण मराठे. धंदा नाही कोणाला? ब्राह्मणमराठ्याला. रेल्वेवरती हरघडी पाणउतारा होतो कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. धर्म गेला कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. मराठी मंडळ कोणाचे? ब्राह्मण मराठ्यांचे. सर्वतोपरी ऱ्हास भासतो कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. प्रस्तुत ऱ्हासाचा प्रश्‍न काढला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. उन्नतीचे उपाय हवेत कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. विशेष नीच लुच्चे व धर्मभ्रष्ट कोण? तर ब्राह्मण मराठे. धर्मसचोटी व शील वाढवावेसे “वाटते’ कोणाला? तर ब्राह्मण मराठ्यांना. महाराष्ट्र बुडविला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. महाराष्ट्रावर निःसीम प्रेम कोणाचे – प्रिय महाराष्ट्रातील ब्राह्मण मराठ्यांचे, असा हा ब्राह्मणमराठ्यांचा आजपर्यंतचा प्रश्‍न आहे.”
उतारा काहीसा लांबलचक असला तरी राजवाड्यांचा दृष्टिकोन समजण्यासाठी आवश्‍यक आहे. महाराष्ट्र हा ब्राह्मण आणि मराठा या दोन राज्यकर्त्या अभिजनांचा असल्याचे राजवाड्यांचे मत आहे. महाराष्ट्र सर्वांचा आहे, जे राजारामशास्त्री भागवतांचे मत होते, त्याच्या अगदी विरोधी असा हा राजवाड्यांचा वर्चस्ववाद आहे. या दोन विद्वानांची यथायोग्य तुलना राजवाड्यांचे वारसदार मानल्या गेलेल्या दत्तोपंत पोतदारांनी अत्यंत समर्पकरीत्या केली आहे. पोतदार लिहितात- “”राजारामशास्त्र्यांची राजवाड्यांशी पुष्कळ बाबतीत तुलना करता येईल. दोघेही नैरूक्तिक होते. दोघेही इतिहासपंडित होते. दोघेही लोकांना विक्षिप्त वाटत. दोघेही सडेतोड व बाणेदार होते. मऱ्हाटी व मऱ्हाटे यांचा जाज्वल्य अभिमान दोघांच्या ठायी उत्कट होता. दोघांची भाषासरणी व विचारसरणी स्वतंत्र होती. साधी राहणी व उच्च विचारसरणी या कोटीत दोघेही पडतात. दोघांचेही जगाशी पटत नसे… एकास ब्राह्मण्याचा उत्कट अभिमान होता, तर दुसरा ब्राह्मणी काव्याच्या कल्पनांनी व्याप्त झाला होता. एकास युरोपियनांचे वावडे असे, तर दुसऱ्यास मिशनऱ्यांच्या सहवासात व सेवेत आयुष्य कंठणे परवडले… दोघेही समकालीन असून, “भेटी नाही जन्मवरी’ असा प्रकार होता. एकाच पर्वताच्या एकाच सोंडेमुळे दोन अंगाला बनलेल्या दोन खोऱ्यांतून दोन स्वतंत्र प्रवाह निघावेत आणि दोन्ही एकाच दिशेने; परंतु एकमेकांस स्पर्श न करता समुद्रास मिळावेत, असा काहीसा प्रकार या दोन जबरदस्त विद्वानांच्या लेखनप्रवाहासंबंधाने झाला, असे म्हटले असता उचित दिसेल.”
दत्तोपंत पोतदारांची निरीक्षणे वस्तुस्थितीस धरूनच असल्याचे म्हणावे लागते. राजवाड्यांमधील ब्राह्मण्याच्या ज्या उत्कट अभिमानाचा ते उल्लेख करतात, त्याने राजवाड्यांची इतिहासमीमांसा झाकोळून गेली आहे. वरील लांबलचक उताऱ्यात त्यांनी महाराष्ट्र हा ब्राह्मण मराठ्यांच्या व म्हणून त्याची काळजी ब्राह्मण मराठ्यांनाच, असे म्हटले असले आणि त्यामुळे ते सकृत्‌दर्शनी ब्राह्मण मराठा युतीचे पुरस्कर्ते वाटत असले, तरी विश्‍लेषणाअंती त्यांनी मराठ्यांना कसे दुय्यम ठरवले आहे, ते दिसून येईल. महाराष्ट्राच्या प्राचीन वसाहतीकरणाचा जो इतिहास त्यांनी मांडला, त्यातून हे चित्र स्पष्ट होते. हा इतिहास मांडताना त्यांनी महाराष्ट्रातील हजारो ग्रामनामांची जी व्युत्पत्तीशास्त्रीय छाननी केली, त्यावरून त्यांना पारंपरिक यास्क,पाणिनी, पतंजलींसारख्या नैरूक्तिकांच्या डोक्‍यावर बसवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला नाही. ते इतिहाससंशोधक म्हणून अधिक गाजले असले, तरी ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांनी भाषाशास्त्रज्ञ आणि वैयाकरण या नात्याने त्यांची कामगिरी अधिक महत्त्वाची असल्याचे मानले होते. महाराष्ट्राच्या प्राचीन अथवा वासाहतिक इतिहासाची राजवाड्यांची मांडणी मुख्यत्वे भाषेच्या पायावरच आधारित आहे. पाणिनी, कात्यायन, पतंजली अशा व्याकरणकारांच्या लिखाणाचे ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या अंगाने विश्‍लेषण, पुराणग्रंथातील उल्लेख आणि प्रचलित ग्रामनामांच्या व्युत्पत्त्या या साधनसामग्रीच्या जोरावर आणि अर्थातच आर्यवंशश्रेष्ठत्व आणि गौणत्वाने ब्राह्मणमराठा वर्चस्व; परंतु प्राधान्याने व अंतिमतः ब्राह्मणवर्चस्व या गृहितकांच्या आधारावर राजवाडे आपली इतिहासाची इमारत उभी करतात.
या इतिहासाच्या पहिल्या भागाची मांडणी आपण यापूर्वीच केली आहे. नर्मदेच्या पलीकडे, उत्तरेतील विशेषतः मगध नावाच्या महाराष्ट्रातील चातुर्वर्ण्याधिष्ठित सनातन वैदिक धर्मावर बौद्ध-जैन लोकायतादी अवैदिक पाखंडे आणि नंद व मौर्य घराण्यांतील शुद्ध क्षत्रियांचे द्वेष्टे असणारे सत्ताधीश यांच्या रूपाने कोसळलेल्या दुहेरी संकटातून सुटका करून घेण्यासाठी तेथील महाराजिक ऊर्फ महाराष्ट्रीक गणाच्या लोकांनी दक्षिणेत स्थलांतर करून तेथील दंडकारण्यात वसाहती केल्या. त्यांचाच मार्ग कुरुपांचालदेशातील राष्ट्रिकांनी आणि उत्तरकुरू व उत्तरमद्रातील वैराष्ट्रिकांनीही अवलंबला. पुढे या तिघांचाही उल्लेख महाराष्ट्रीक या सामान्य नावानेच होऊ लागला.
दंडकारण्य कोणते?
परंतु या महाराष्ट्रिकांना दंडकारण्यातील आद्य वसाहतकार म्हणता येईल काय? वैदिक साधनांनाच अनुसरायचे झाल्यास आर्यांच्या दक्षिणेतील वसाहतीचा पहिला मान निःसंशयपणे अगस्ती ऋषींकडे जातो; परंतु अगस्ती कोणी सत्ताधारी राजेमहाराजे नव्हते. वाल्मिकी रामायणानुसार इक्ष्वाकू कुळातील दंडक नावाचा राजा दक्षिणापथात राज्य करीत होता. त्याच्यावरूनच या प्रदेशाला “दंडकारण्य’ हे नाव पडले.
पण एका राज्याचे रूपांतर अरण्यात कसे झाले?
हा दंडक इक्ष्वाकूच्या शंभर पुत्रांपैकी तिसरा. इक्ष्वाकूने त्याला विंध्याद्री व शैवल पर्वत या दोहोंमधील प्रदेशाचे राज्य दिले. या प्रदेशातील मधुमंत नावाची नगरी त्याने आपली राजधानी केली. वस्तुतः वसिष्ठ हा इक्ष्वाकूचा पुरोहित. इक्ष्वाकूचा दुसरा पुत्र निमि याने वसिष्ठालाच आपला पुरोहित नेमले. दंडकाने भृगूच्या कुळातील एका ऋषीस आपले पौरोहित्य दिले. एकदा त्याने कामातुर होऊन आपल्या गुरूच्या अरजा नावाच्या कन्येवर बलात्कार केला. त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्या भार्गव पुरोहिताने दंडकाला बल, कोश इ. राज्यांगांसह शापाने भस्मसात केले. तेव्हापासून त्याच्या राज्याच्या चारशे योजनांचा प्रदेश उजाड झाला. त्याला “दंडकारण्य’ असे नाव पडले. (इकडे निमि आणि वसिष्ठ यांनीही एकमेकांना वेगळ्या कारणांमुळे शाप देऊन नष्ट केले.) पुढे इक्ष्वाकू वंशातीलच दाशरथी राम आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासमवेत वनवासाला गेला, तेव्हा त्याच्या वनवासाचा बराच काळ याच दंडकारण्यातील जनस्थान नामक भागात व्यतीत झाला. दंडकारण्य त्या वेळी लंकाधिपती रावणाच्या राज्याचा भाग बनला होता. रावणाने तो आपली विधवा बहीण शूर्पणखा हिला देऊन आपला सावत्र भाऊ खर यास सेनापती दूषणासह तेथे ठेवले होते.
दंडकारण्याच्या संबंधी एका वेगळ्या मताचीही येथे नोंद घ्यायला हवी. जैन परंपरेतील आचार्य विमलसुरींच्या “पउमचरियं’ या ग्रंथात (शूर्पणखेऐवजी?) चंद्रनखा नावाच्या स्त्रीचा उल्लेख आहे; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्यानुसार दंडक नावाचा पर्वत होता व त्या पर्वतावर दंडक याच नावाच्या एका महानागाचे वास्तव्य होते. त्यामुळे या प्रदेशाला दंडकारण्य हे नाव प्राप्त झाले.
दंडकारण्य शब्दाची व्युत्पत्ती काहीही असो. महाराष्ट्राचा व त्याचा संबंध आजही इतका दृढ आहे, की कोणत्याही वैदिक कर्माचा संकल्प सांगताना आपण राहतो त्या प्रदेशाचा उल्लेख “दंडकारण्य’ असाच केला जातो. मध्ययुगीन दानपत्रांमधून दान दिलेल्या भूमीच्या वर्णनात दंडकारण्याचा उल्लेख अनेकदा येतो. उदाहरण म्हणून डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या “शोधमुद्रा’ (खंड 1) मध्ये प्रसिद्ध झालेल्या वसमतजवळील रांजणा येथील नृसिंह मंदिरातील शके 1139 मधील आमणदेवाचा शिलालेख घेऊ. या लेखातील स्थलाचा उल्लेख “भारत वर्षे जंबुद्वीपे दंडकारण्ये’ असा झाला आहे.
राजवाड्यांच्या मते वऱ्हाड, नागपूर, उत्तर कोकण, आंध्र प्रदेश, गोदातीर या दंडकारण्याच्या भागात आर्यांच्या वसाहती प्रथम झाल्या. नाणे मावळातील 168 गावांच्या नावांचा अभ्यास करून त्यांनी असा अंदाज बांधला, की दंडकारण्यातील हा “”मावळ प्रांत अरण्याच्या अगदी गाभ्यात व सह्यपर्वताच्या कुहरात असल्यामुळे यात वसाहती बऱ्याच उशिरा झाल्या असाव्यात.”
मावळातील ग्रामनामांच्या संस्कृतोद्भवतेवर बोट ठेवून राजवाडे सांगतात, की आधी हा भाग निर्भेळ अरण्य होता. तेथे मनुष्यवस्ती अजिबात नव्हती. पहिल्यांदा तेथे राक्षस अवतरले. (राक्षस ही माणसांचीच एक जात). मग नाग (हाही मनुष्यवंशच) आणि मग आर्य. ते असेही मान्य करतात, की “”ग्रामनामांवरून दिसते, की सनातन धर्म नाणेमावळात असून, शिवाय बौद्ध धर्माची छाया या मावळावर बरीच दाट पडली होती.”
खरे महाराष्ट्रिक कोण?
राजवाड्यांची महाराष्ट्रातील आर्य वसाहतीकरणाची कथा खूप गुंतागुंतीची आहे. ते नेमके केव्हा झाले, हे त्यांना सांगता येत नसले तरी ज्या अर्थी अशोकाच्या शिलालेखात रस्टिकांचे नाव अवतीर्ण होते, त्या अर्थी रस्टिक किंवा राष्ट्रिक किंवा रट्ट हे तेव्हा येथे येऊन स्थिरावले असणार, हे उघड आहे. या रट्टांनी वसाहतीकरणात पुढाकार घेतल्यामुळे, खरे तर ते उत्तरेत असल्यापासूनच त्यांच्याकडे प्रादेशिक किंवा स्थानिक अधिकारपदे असल्यामुळे, पाटील, देसाई, देशमुख ही पदे त्यांच्याकडे आपोआपच आली व पिढीजात किंवा वंशपरंपरागत झाली. ते वर्णाने क्षत्रिय व पेशाने देशाधिकारी. त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाच्या क्षत्रिय अधिकाऱ्यांना सरपाटील, सरदेशमुख, सरदेसाई असे म्हणण्यात येई. पण ही पदे सांभाळणारे साधे राष्ट्रीक किंवा रट्ट नसून महाराष्ट्रिक होत. महाराष्ट्रिक याचाच अपभ्रंश महरट्ट व महरट्ट याचा अपभ्रंश मऱ्हाट. “”हे रट्ट जी संस्कृतोत्पन्न अपभ्रष्ट भाषा बोलत ती दंडकारण्यातील राजमान्य, लोकमान्य व कविमान्य महाराष्ट्री ऊर्फ महरट्टी व पुढे कालांतराने मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांत प्रकृष्ट म्हणून प्रख्या पावली… रट्ट व महरट्ट हे वर्णाने व जातीने क्षत्रिय, दर्जाने देशाधिकारी आणि सत्तेने राष्ट्राधिकारी, देशाधिकारी व ग्रामाधिकारी पडल्यामुळे, मुलखातील सर्व प्रकारचे पुढारपण यांच्याकडे आले होते. आणि असले हे सर्वतो प्रकारे उच्चस्थानापन्न लोक जो अपभ्रंश बोलत तो सर्व अपभ्रंशांत श्रेष्ठतम ठरावा यात नवल कोणते? भारत वर्षातील काश्‍मीरपासून कुमारीपर्यंत जे जे संस्कृतप्राकृत नाटककार होऊन गेले, त्यांनी उच्च दर्जाच्या पात्रांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घातलेली जी आढळते, तिचे कारण ही महाराष्ट्री भाषा द्रव्यबल, मनुष्यबल व सत्ताबल अशा विविध बलांनी समलंकृत अशा उच्चवर्णाच्या क
्षत्रियरट्टांची भाषा होती.”
राजवाडे असाही तपशील सांगतात, “”मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्‍य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून व महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास.”
अर्थात या रट्टांबरोबर “”निरनिराळ्या दीडशे प्रकारचे लोक दंडकारण्यात भारतवर्षाच्या नाना प्रदेशांतून शिरले. परंतु या सर्व लोकांचे पुढारपण रट्ट व महारट्ट यांजकडे असे. – हे लोक यद्यपि भिन्नप्रांतीय, भिन्नजातीय व भिन्नवृत्तीय होते. तत्रापि, रट्टांचे तेज सर्वांवर पडून त्या सर्वांना कालांतराने महाराष्ट्रीय ऊर्फ मऱ्हाटा ही संज्ञा प्राप्त झाली.”

मराठे म्हणजे यादव?

मराठे म्हणजे यादव?
- डॉ. सदानंद मोरे
(सौ .साप्ताहिक सकाळ )
प्रत्येक प्रांत आणि तेथील घराणी यांचा उल्लेख इतिहासात डोकावता अनेकदा केला जातो. राजारामशास्त्री भागवत यांनी त्यांच्या साहित्यातून दक्षिणेकडच्या यादवांचा महाराष्ट्राशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात महाराष्ट्राचा यदुक्षेत्र असा उल्लेख आल्याने संदर्भांना वेगळे वळण मिळू शकते.
शिखरशिंगणापूरचा श्रीशंभुमहादेव हा डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेला ग्रंथ एका महत्त्वाच्या कारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. एका कुलदैवताच्या माध्यमातून कुलाचा, कुलसमूहाचा आणि त्याच्या प्रादेशिकतेचा शोध डॉ. ढेरे या ग्रंथातून घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुळ राजस्थानातील शिसोदिया राजपुतांमध्ये न शोधता दक्षिणेतील होयसळ यादवांमध्ये या कुळाचे मूळ शोधण्याचा त्यांचा महाप्रकल्प आहे. ढेरे यांच्या प्रस्तुत ग्रंथामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दक्षिणायनाला चांगलीच गती मिळाली आहे.
परंतु खुद्द यादवांच्याच मुलाबद्दल ढेरे यांच्या लेखनात पुरेशी स्पष्टता नाही. पशुपालक गोपजनांसाठी प्रचलित असलेला व प्रतिष्ठित झालेला “यादव’ हा कुलवाचक शब्द म्हणजे एक मोठे कोडेच आहे. डॉ. ढेरे विशेषतः दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर घडून आलेल्या यादवीकरणाकडे लक्ष वेधतात. हे यादवीकरण क्षत्रियीकरणही आहे. या प्रक्रियेचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न ढेरे करतात.
ढेरे यादव कुळाच्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नसले, तरी काही प्रसिद्ध गोष्टींचा उल्लेख आपोआप झालेला आहे. यादव कुळातील अवतार मानला जाऊन सर्वाधिक मान्यता मिळालेला श्रीकृष्ण आणि ज्याचे नाव “यादव’ शब्दातच अनुस्यूत आहे, तो यदू. यदू, यादव आणि यादवकुलकौस्तुभ कृष्ण यांच्याविषयी खूप काही लिहिले गेले आहे. वायू, विष्णू, ब्रह्मांड यांच्यासारख्या पुराणांमधून, महाभारतामधून आणि महाभारताचेच खिल पर्व अर्थात परिशिष्ट मानल्या गेलेल्या हरिवंशपुराणामधून याविषयी वाचायला मिळते. त्यातील सर्वश्रुत व सर्वपरिचित वर्णनानुसार यदू म्हणजे ऐल वंशातील ययातीला शुक्राचार्यकन्या देवयानीपासून झालेला पुत्र, आणि या यदूचे वंशज म्हणजेच यादव. या यादवांची अनेक कुले असून, मथुरा ही त्यांच्या राज्याची राजधानी. मगधाच्या विस्तारवादी सम्राट जरासंधाने मथुरेवर वारंवार आक्रमणे केल्यामुळे कृष्णाच्या सल्ल्यानुसार यादवांनी आपली राजधानी पश्‍चिम किनाऱ्यावरील द्वारका या बंदरात हलविली.
उत्तरेतील हे यादव दक्षिणेत पसरले, असा आणखी एक समज उपरोक्त साधनांच्या आधारे रूढ झालेला आहे. त्यानुसार विदर्भातील राज्य हे याच यादवांच्या एका शाखेचे असून, येथे राज्य करणाऱ्या भीष्मक नावाच्या राजाची कन्या रुक्‍मिणी म्हणजेच श्रीकृष्णाची पत्नी. रुक्‍मिणीने द्वारकेच्या कृष्णाला मनोमन वरले होते, परंतु तिचा भाऊ रुक्‍मी याला हा संबंध मान्य नसून, त्याने रुक्‍मिणीचा वाङ्‌निश्‍चय परस्पर चेदी देशाचा राजपुत्र शिशुपाल याच्याशी करून टाकला होता. परंतु रुक्‍मिणीने कृष्णाला पत्र लिहून आपले प्रेम व्यक्त केले व कृष्णाने लग्नाच्या दिवशीच तिचे हरण केले, ही रुक्‍मिणी स्वयंवराची कथा लोकप्रिय आहे. आता हा शिशुपाल तरी कोण? चेदी देशाचा राजा दमघोष याला झालेला, श्रीकृष्णाच्या श्रुतश्रवा नामक एका आत्याचा मुलगा. एवढे सारे जवळचे नातेसंबंध असूनही भीष्मक, रुक्‍मी, शिशुपाल ही मंडळी कृष्णाला व त्याच्या शाखेला कमी समजून त्यांच्याकडे तुच्छतेने बघायची. पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या प्रसंगी तर शिशुपालाने कृष्णाचे निंदासत्रच सुरू केले. शेवटी कृष्णाने त्याचा तेथेच सुदर्शनचक्र सोडून शिरच्छेद केला, इ. कथाभाग आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. पण त्यात यादव मूळचे उत्तरेतील, शूरसेन मथुरा प्रदेशातील व तेथून दक्षिणेकडे आले, असे आपणही गृहीत धरलेले असते. डॉ. ढेरेही या कौलिक व्यवहारातील बारीकसारीक तपशील देण्याच्या भानगडीत पडत नाहीत; पण यादव मुळातले दक्षिणेतले गोपजन ऊर्फ पशुपालक असे मानण्याकडे त्यांचा कल दिसतो. निदान दक्षिणेतील अनेक गोपजनांचे यादवीकरण झाले. त्यांचा उत्तरेतील यादवांशी साक्षात संबंध लावण्याची जरुरी नसल्याचेही त्यांच्या लिखाणातून ध्वनित होते.
यादव हे मुळातले दक्षिणेतले. त्यांचे राज्य प्रबळ झाले ते महाराष्ट्रात आणि तेथून ते भारतात अन्यत्र पसरले. महाराष्ट्र हे मुळातले यदुक्षेत्र आणि महाराष्ट्रातील शिवछत्रपतींसह सर्व मराठे यादवच, अशी भूमिका कोणी मांडली तर? परंतु असा भविष्याभिमुख उत्तराची अपेक्षा करणारा प्रश्‍न विचारायची आवश्‍यकताच नाही. ही भूमिका मांडली आहे राजारामशास्त्री भागवत यांनी. “यदुक्षेत्रात ब्राह्मणांचा प्रवेश’ या पुस्तकात भागवतांनी रामायण, महाभारत, पुराणादी पारंपरिक वैदिक साधनांच्या आधारेच या अभिनव आणि उलथापालथ करणाऱ्या क्रांतिकारक शोधाची मांडणी केली आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासातील दक्षिणी पक्षाच्या पुरस्कर्त्यांनी त्याकडे नीट लक्ष दिलेले दिसत नाही.
महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा इतिहास सिद्ध करताना राजारामशास्त्र्यांनी भाषिक पुराव्याचा आणि भाषाशास्त्रीय पद्धतीचा भरपूर उपयोग केला, हे आपण जाणतोच. शास्त्रीबुवांचा वैदिक परंपरेतील सर्व प्रकारच्या संस्कृत शास्त्रीय व ललित ग्रंथाचा व्यासंगही पक्का होता. त्याचा उपयोग त्यांनी यादवांचे कोडे सोडविण्यासाठी करून घेतला.
व्यक्तींना ओळखण्यासाठी बालपणीच त्यांचे नामकरण केले जाते, परंतु भाषेत व्यक्ती तितकी नावे उपलब्ध नसल्यामुळे एकच नाव अनेक व्यक्तींना ठेवले जाऊ शकते. विशेषतः एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात डोळ्यांत भरण्यासारखा पराक्रम केला, प्रसिद्धी मिळवली तर तिचे नाव आपल्या अपत्यांना ठेवण्याची जणू लाटच येते. यात तत्त्वतः गैर असे काहीच नाही; परंतु कालांतराने नावांतील साम्यामुळे व्यक्तीव्यक्तींमध्ये घोटाळा होऊ शकतो व त्याचा परिणाम इतिहासलेखनावर होऊ शकतो. एकाचे श्रेय दुसऱ्याला, तर दुसऱ्याचा पराक्रम तिसऱ्याच्या नावावर, असा गोंधळही त्यातून निष्पन्न होतो. तसेच, काळ जेवढा प्राचीन तेवढी ही घोटाळा होण्याची शक्‍यताही अधिकच. असाच काहीसा प्रकार भागवतांच्या मते, यादवांचा आद्य पूर्वज यदू याच्या बाबतीत घडलेला आहे.
रावणाची कुम्भीनसी नामक (सावत्र) बहीण होती. ती म्हणजे माल्यवान राक्षसाची कन्या अनला हिला विश्‍वावसू राक्षसापासून झालेली मुलगी. तिच्या आईचे नाव सुंदरा. या कुम्भीनसी नावाच्या कन्येचे मधू दैत्याने हरण करून तिच्याशी लग्न लावले. या दांपत्याला लवण नावाचा पुत्र व मधुमती नावाची कन्या, अशी अपत्ये झाली. याच लवणासुराचा वध रामाचा भाऊ शत्रुघ्नाने केला व त्याच्याच मधुवनात मधुरा नावाची नगरी वसवली.
इकडे मधुमतीचा विवाह ईक्ष्वाकू कुलातील हर्यश्‍व नावाच्या राजाशी झाला. हर्यश्‍व आणि मधुमती यांना जो मुलगा झाला, त्याचे नाव यदू. या यदूने एका नागकन्येला वरले.
नाग शब्दाची शास्त्रीबोवांनी दिलेली व्युत्पत्ती चिंतनीय आहे. नग (न जाणारा, स्थिर) म्हणजे डोंगर. अशा डोंगराळ प्रदेशात राहणारे ते नाग. आता या यदूच्या कुलाचा म्हणजे दक्षिणेतील यादवांच्या वंशाचा नकाशा भागवतांच्याच शब्दांत काढायचा झाला तर “”यदूचा बाप ईक्ष्वाकू वंशातला व आई दानवी व आईची आई राक्षसी. त्याच्या मुलाचे आजोळ नागांच्या राजाकडचे.” याशिवाय याच काळात दक्षिणेत वास्तव्य करून असलेल्या वानरांचीही या यादव कुळात सरमिसळ झाली असण्याची शक्‍यताही ते सूचित करतात.
यदूच्या वंशात जन्माला आलेला कृष्ण हा आणखी एक पिढी मागे गेले असता मधूच्या गोत्रातला ठरतो, म्हणून त्याला माधव असे म्हटले असल्याचे भागवत स्पष्ट करतात.
साऱ्या विवेचनाचा इत्यर्थ भागवतांच्याच शब्दांत सांगायचा झाल्यास असे म्हणता येते, की “”यदूंची आद्य भूमी द्रविड होय. “मधुरा’ हा अस्सल शब्द त्यामधील एका नगरीसच लावला जातो. सिंहल द्वीपातील “मतुरा’ व यमुनेवरील “मथुरा’ हे “मधुरा’ या शब्दाचे जसजसे यादव पसरत गेले, तसतसे अपभ्रंश झाले.”
उत्तर आणि दक्षिण येथील स्थळांची आणि नद्यांची उलटापालट हा भागवतांच्या एकूणच पद्धतिशास्त्राचा भाग आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रातील गोदावरी या नावाने ओळखली जाणारी नदी हीच खरी किंवा मूळ गंगा. याच गंगेच्या तीरावर प्रतिष्ठान किंवा पैठण नगर वसले होते. उत्तरेतील भागीरथी या नदीला याज्ञिकांनी “गंगा’ हे नाव दिले व गंगा-यमुनेचा संगम जेथे होतो, तेथे प्रतिष्ठान ओढून आणले.”
“जे गोप तेच गुर्जर व तेच यादव’ असा राजारामशास्त्र्यांचा सिद्धान्त आहे. हे “गोप मूळचे दाक्षिणात्य असून, गोपकुलात जन्म घेणारा कृष्णही दाक्षिणात्यच,’ ही त्याची पुढची निष्पत्ती आहे. या यादवांची मूळ भूमी अर्थातच मधुवन आणि त्यांच्या मूळ पूर्वज यदू मधुमतीचा पुत्र. असे असताना परंपरा यदूला ययातीचा पुत्र का मानते, याचे स्पष्टीकरण शास्त्रीबोवांच्या शब्दात देणे अधिक उचित होईल.
“”एकदा पृथ्वी परशुरामाने निःक्षत्रिय केली व निःक्षत्रिय झाली असता, ती पुन्हा एकदा-दोनदा नव्हे, तर बरोबर वीस वेळा आणखी निःक्षत्रिय केली व याप्रमाणे त्रेतायुगातच बरोबर एकवीस वेळा निःक्षत्रिय झाली असतानाही नंदाने एका क्षत्रियापासून शूद्र जातीच्या स्त्रीच्या पोटी जन्म घेऊन ती कलियुगात पुन्हा निःक्षत्रिय केली व नंदाबरोबर सर्व क्षत्रिय जमात लयास गेली. अशा प्रकारचे पूर्वापार विरोधी लेख लिहिणाऱ्या बराह्मण पौराणिकांनी जर निःशेष यदुवंशाचा लोप करून टाकिला किंवा तो वंश दाक्षिणात्य असतानाही आपल्या गुरुतल्पव्यसनी राजाचे माहात्म्य वाढविण्यासाठी त्यास ययातीचे पुत्रत्व दिले तर त्यात आश्‍चर्य ते कोणते?”
शास्त्रीबोवांनी ब्राह्मण पौराणिकांवर गंभीर आरोप केले आहेत. वस्तुतः पुराणांची रचना करायचे काम सूत नावाच्या वेगळ्याच जातीचे होते. पार्गिटर या पाश्‍चात्त्य संशोधकाच्या मते, मुळात सुतांची निर्मिती असणाऱ्या पुराणांवर कालांतराने ब्राह्मणांनी हात फिरवला व त्यात आपणास अनुकूल असे बदल केले.
भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासलेखनातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची भूमिका समजावून घेतल्याशिवाय हा इतिहास आकलनकक्षेत येणे अवघड आहे. “सह्याद्री’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक स. आ. जोगळेकर उलट क्षत्रियांनीच पुराणात फिरवाफिरव केली, असा प्रत्यारोप करतात. आता काही जैन ग्रंथांमध्ये क्षत्रियांची बाजू घेऊन ब्राह्मणांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झाले, हे खरे आहे. कार्तवीर्याचा पुत्र सुभूम हा जैनांचा आठवा चक्रवर्ती. त्याने परशुरामाचा वध केला आणि पृथ्वी एकवीस वेळा निर्ब्राह्मण केली, अशी एक कथा स्वतः जोगळेकरच जैन ग्रंथांच्या आधारे सांगतात. परंतु असा काही प्रकार वैदिक परंपरेतील पुराणांमध्ये घडला असल्याचे ते जोपर्यंत दाखवू शकत नाहीत, तोपर्यंत त्यांचा हा दावा पोकळच राहील. रामाने व भीष्माने परशुरामाचा पराभव किंवा तेजोभंग केल्याच्या कथा अनुक्रमे रामायणात व महाभारतात आढळतात. त्या बनावट असून, क्षत्रियांनी रचल्याचे जोगळेकर सूचित करतात. मात्र त्यासाठी ते कोणताही पुरावा देऊ शकत नाहीत. परशुरामाच्या विरुद्ध जे काही लिखाण आढळते, त्यात अलीकडील जोतिराव फुल्यांपासून का. बा. देशमुखांपर्यंतच्या ब्राह्मणेतर लेखकांच्या लेखनाचा समावेश आहे. ते सर्वथा प्रतिक्रियात्मक आहे. राजारामशास्त्री स्वतः ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर इतरांप्रमाणे ब्रह्मद्वेषाचा आरोप करता येत नाही. त्यांनी अत्यंत प्रांजळपणे सांगितले आहे, की विसंगती आणि अतिशयोक्ती यांनी युक्त असलेली परशुरामकथा ब्राह्मणांनी आपले माहात्म्य वाढवण्याच्या उद्देशाने तयार केली. एरवी संख्या आणि बळ यांचे बाहुल्य असलेल्या क्षत्रियांचा एकवीस वेळा निःपात करणे अशक्‍यप्रायच म्हटले पाहिजे.
परशुरामकथेचा मुद्दा यासाठी प्रस्तुत ठरतो, की भारताच्या इतिहासात जातीय गुंतागुंत किती आहे, हे लक्षात यावे. अशीच वांशिक गुंतागुंतही आहेच. आर्य आणि द्रविड हे प्रकरण याच गुंतागुंतीचा एक भाग. राजारामशास्त्र्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन या गुंतागुंतीचे अवघड पदर उलगडण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रासह दक्षिण अथवा द्रविड देश हीच यदूची व म्हणून यादवांची मूळ भूमी असून, इथूनच यादव भारतात अन्यत्र पसरले. या भूमीला ते यदुक्षेत्र असे नाव देतात. आणि मुख्य मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील मराठे म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून, यादवच होत. भागवतांनी केलेली इतिहासाची आणि भूगोलाची ही उलथापालथ अभूतपूर्वच म्हणायला हवी.
मात्र राजारामशास्त्र्यांनी केलेली ही उलथापालथ केवळ काल्पनिक आहे, असे म्हणता येणे कठीण आहे. त्यांना पाठबळ देणारे आणखी उल्लेख सापडू शकतात. कृष्णाच्या एका पत्नीचे नाव जांबुवती असे असून, ती जांबवान या अस्वलांच्या राजाची कन्या असल्याचा समज आहे. त्याचा अर्थ अस्वल हे देवक किंवा प्रतीक किंवा ध्वजचिन्ह असणारी वन्य जमात, असा घेता येतो. या जांबुवतीपासून कृष्णाला झालेल्या मुलाचे नावच मुळी द्रविड. विशेष म्हणजे कृष्णाशी कुस्ती करणारा त्याचा हा सासरा रामावतारातील जांबुवानाचा अवतार किंवा तत्सम कोणी असल्याचाही समज आहे. आता हा जांबवान दक्षिण देशातीलच होता, हे वेगळे सांगायला नको. थोडक्‍यात, यादवांची पाळेमुळे दक्षिणेत पसरलेली दिसतात, ती अशी. यादव जसे प्रसरणशील तसेच मराठेही, असे भागवत ठामपणे सांगतात.

Wednesday, May 29, 2013

गझलचे व्याकरण्

गझलचे व्याकरण्



सुरुवात




आता महाराष्ट्रात गझल हा काव्यप्रकार आपल्या अंगभूत शक्तीमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. आता नव्या दमाची तरूण पिढी गझलेकडे वळू लागली आहे. परंतु दुर्दैवाने गझलेची पुरेशी किंवा मुळीच माहिती नसल्यामुळे कोणतीही रचना अनेकदा "गझल" म्हणून सादर केली जाते.

गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार असल्यामुळे गझल लिहिणारा आधी उत्तम कवी असला पाहिजे, ही गझलेची पूर्वअट आहे. आणि त्याबरोबरच गझल लिहिणाऱ्याला आधी वृत्तात कोणतीही चूक न करता लिहिता आले पाहिजे. गझलेमध्ये शेवटपर्यंत एकच वृत्त वापरले पाहिजे, हे गझल लिहू इच्छिणाऱ्या कवीने लक्षात ठेवले पाहिजे.

"गझला" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मूळ अरबी शब्द "गजल" आहे. तोही स्त्रीलिंगी शब्द आहे. हा शब्द जसाच्या तसा फारसीत आला आहे तोही स्त्रीलिंगी म्हणूनच. आणि मराठीत "गजल" ह्या शब्दाला "गझल" हे रूप मिळाले. गझलेचा एकूणच पिंड, तिचा नखरा व नजाकत पाहाता तिचे लिंगपरिवर्तन करणे योग्य नव्हे.

एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.

गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो.  गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.

नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.

जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.

गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.

नेहमीची कविता आणि गझल ह्यांत - १) अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये बांधणी आणि मांडणी आणि २) प्रत्येक शेराचे स्वतःचे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व, हे दोन महत्वाचे व मूलभूत फरक असतात.


गझलेचा आकृतीबंध



आता गझलेचा आकृतिबंध म्हणजे काय हे समजून घेऊ या. कारण हा आकृतिबंध समजल्याशिवाय गझल लिहिता येत नाही.

गझलेचा आकृतिबंध
संबंधित गझलेचे वृत्त (बहर), यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) असल्यास अन्त्ययमक या घटकामुळे गझलेचा आकृतिबंध निश्चित होतो. या आकृतिबंधालाच "जमीन" असे म्हणतात.

ही न मंजूर वाटचाल मला
दे भविष्या तुझी मशाल मला
संत समजून काल मी गेलो
भेटला शेवटी दलाल मला
मी कधीचा उभाच फिर्यादी
वाकुल्या दाखवी निकाल मला
माझ्या या गझलेतील हे तीन शेर आपण वाचले. या तिन्ही शेरात (जातीच्या अंगाने आलेले) एकच वृत्त आहे.
राधिका, राधिका, यमाचा, गा

हेच वृत्त या गझलेत शेवटपर्यंत कायम राहते. या गझलेचा शेवटचा शेर असा आहे-
ये, लपेटून चांदणे घेऊ
तू कशाला दिलीस शाल मला?

वर निर्देशिलेले वृत्त "राधिका, राधिका, यमाचा, गा" या शेवटच्या शेरातही कायम आहे.
गझलेच्या पहिल्याच शेरात तिचा आकृतिबंध- तिची जमीन 'जमीन' स्पष्ट होते. कारण पहिल्या शेरात गझलेचे वृत्त, यमक आणि अन्त्ययमक स्पष्ट होते.
वर दिलेल्या उदाहरणात वृत्त (राधिका, राधिका, यमाचा, गा) स्पष्ट झाले आहे. आणि पहिल्या दोन ओळीत "वाटचाल" व "मशाल" ही दोन यमके आली आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही ओळीत "वाटचाल" आणि "मशाल" या यमकानंतर "मला" हे अन्त्ययमक आले आहे.
गझल शेवटपर्यंत एकाच वृत्तात चालत असली तरी तिच्या फक्त पहिल्या शेराच्या दोन्ही ओळीत यमक आणि अन्त्ययमक येते. नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीतच यमक आणि त्यानंतर  अन्त्ययमक येते.

गझलेतील अन्त्ययमक (रदीफ) गझल संपेपर्यंत बदलत नाही. काही गझलात अन्त्ययमक नसते. पण ज्या गझलेत अन्त्ययमक असते, त्या गझलेत ते अन्त्ययमक शेवटपर्यंत कायम राहते. एका शेरात एक अन्त्ययमक तर दुसऱ्या शेरात दुसरे अन्त्ययमक असा हास्यास्पद प्रकार गझल खपवून घेत नाही.

त्याचप्रमाणे आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, गझलेत यमक उर्फ काफिया बदलत नाही, त्याचे शब्द बदलतात. यमकाच्या शब्दात असलेली "अलामत" उर्फ "स्वरचिन्ह" हेच त्या यमकाचे स्थायी गमक असते. या अलामतीवरच त्या यमकाचे जीवन अवलंबून असते. हे स्वरचिन्ह (अलामत) सांभाळून यमक कसे साधावयाचे, हे मी येथे नंतर यथास्थल स्पष्ट करीन. त्यापूर्वी "काफिया" आणि "रदीफ" या शब्दांचे अधिक स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.




काफिया आणि रदीफ



"काफिया" या अरबी शब्दाचा अर्थ आहे- मागेमागे चालणारा, पुन्हापुन्हा येणारा, पायाला पाय लावून चालणारा.

मी वरील व्याख्येवरून "काफिया" अधिक स्पष्ट दाखविण्याचा प्रयत्न करतो.
चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला
काय तो वेडा इथेही बोलला
हा शहाणाही चळाया लागला?
हाक दाराने मला जेव्हा दिली
उंबरा मागे वळाया लागला
नमुन्यादाखल दिलेल्या माझ्या एका गझलेतील ह्या तिन्ही शेरात "मावळाया, ढळाया, चळाया, वळाया" हे चार शब्द काफिया म्हणून आलेले आहेत. 'मावळाया' ह्या शब्दामागून 'ढळाया' हा शब्द येतो. 'ढळाया'ची पाठ धरून 'चळाया' येतो आणि 'चळाया' नंतर लगेच 'वळाया' हा शब्द त्याच्यामागे येतो. 'ढळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या आधीच्या शब्दाचे अनुसरण केले आहे, तर नंतरच्या शेरात 'चळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' व 'ढळाया' ह्या शब्दांची पाठ सोडलेली नाही. आणि 'वळाया' हा काफियाचा शब्द "मावळाया, ढळाया, चळाया" ह्या आधीच्या (काफिया म्हणून आलेल्या) शब्दांशी नाते राखत आहे. "मावळाया" ह्या काफियाच्या शब्दाच्या मागेमागे, एकामागे एक, अशी एकमेकांचा पदर धरून ही इतर (काफियाच्या) शब्दांची माळ चालत आहे. काफिया हा शब्द पुल्लिंगी आहे. काफियांचे बहुवचन 'कवाफी' असे होते.

आता आपण रदीफ म्हणजे काय ते पाहू या. "रदीफ" ह्या अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्दाचे दोन अर्थ आहेत ते असे-
१) घोडा किंवा उंटावर बसलेल्या स्वारामागे बसलेली व्यक्ती किंवा २) गझलेतील शेरात काफियाच्या (यमक) नंतर पुन्हापुन्हा येणारा शब्द किंवा शब्दगट.
गझलेच्या संदर्भात सांगायचे झाले, तर तिच्या प्रत्येक शेराच्या बाबतीत हे दोन्ही अर्थ अगदी चपखलपणे लागू होतात. कारण आपण जर काफिया (यमक) म्हणून येणाऱ्या कोणत्याही शब्दाला वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेला

स्वार मानले तर रदीफ (अन्त्ययमक) म्हणून येणारा शब्द किंवा शब्दगट त्या स्वाराच्या मागे हटकून स्वार होतो, उदाहरणार्थ -
कालची बातमी खरी नाही
हाय, स्वर्गात भाकरी नाही
मागता काय लेखणी माझी
ही कुणाचीच बासरी नाही
राहिले काय पूर्णिमेत अता?
चंद्र माझ्या उशीवरी नाही
वरील तीन शेरात काफिया (यमक) म्हणून आलेले "खरी, भाकरी, बासरी व उशीवरी" हे शब्द "राधिका, राधिका, यमाचा गा"  ह्या वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेले स्वार आहेत. पण ह्या प्रत्येक स्वाराच्या मागे "रदीफ" म्हणून आलेला "नाही" हा शब्द हटकून  बसतोच!

इस्लामपूर्व काळापासून अरब जमात काव्यप्रेमी आहे. आणि ह्या जमातीच्या जीवनात घोडा आणि उंट ह्या दोन प्राण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. अरबी भाषेनुसार "रदीफ" ह्या शब्दाचा अर्थ "घोड्यावर किंवा उंटावर बसलेल्या स्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती" असा आहे. आणि म्हणूनच अरबांनी आपल्याला छंदशास्त्रातातही काफियानंतर हटकून व चिकटून मागोमाग येणाऱ्या शब्दाला किंवा शब्दगटाला "रदीफ" हेच नाव दिले.

"रदीफ" या स्त्रीलिंगी अरबी शब्दाचे बहुवचन "रदाफी" असे आहे.



स्वरचिन्ह उर्फ अलामत-१



स्वरचिन्ह उर्फ अलामत

गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची "जमीन" निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात. पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. उदाहरणार्थ- वाटचाल, मशाल, दलाल, निकाल, रुमाल, हालचाल वगैरे.

मात्र गझलेतील अन्त्ययमक उर्फ रदीफ म्हणून असलेला शब्द किंवा शब्दगट शेवटपर्यंत बदलत नाही.

वर नमुन्यादाखल दिलेल्या शेरात "मला" हे अन्त्ययमक उर्फ रदीफ आहे. हे अन्त्ययमक, ही रदीफ पहिल्या ओळीत येणार आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीत यमकांनंतर म्हणजेच काफियानंतर हटकून येणार. उदाहरणार्थ - वाटचाल मला, मशाल मला, दलाल मला, आणि शाल मला वगैरे.

ज्याप्रमाणे गझलेच्या पहिल्या शेरात (मतला) तिचा आकृतिबंध उर्फ "जमीन" वृत्त, यमक व अन्त्ययमकावरून ठरत असते, त्याचप्रमाणे ज्या जमिनीत अंगभूत असलेल्या यमकाचे उर्फ काफियाचे स्वरूप त्यातील स्वरचिन्हावरून ठरत असते. या स्वरचिन्हालाच "अलामत" म्हणतात. म्हणूनच ही "अलामत" समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

यमकाच्या उर्फ काफियाच्या शेवटच्या न बदलणाऱ्या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणाऱ्या एका विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो, त्यालाच स्वरचिन्ह किंवा "अलामत" समजावे.
उदाहरणार्थ-
हा ठोकरून गेला, तो वापरून गेला
जो भेटला मला तो वांधा करून गेला

वरील शेरात "ठोकरून, वापरून, करून" अशी यमके उर्फ काफिये (कवाफी) आलेले आहेत. (एकाच ओळीत दोन यमके चालू शकतात.) जर आपण यमकांचे बारकाईने निरीक्षण केले, तर आपणास असे आढळून येईल की "ठोकरून, वापरून, करून" या तिन्ही यमकात "रून" ही शेवटची दोन अक्षरे बदलत नाहीत. मात्र त्यांच्याआधी येणाऱ्या- "ठोकरून" मधील "क" या अक्षरात 'वापरून' या यमकामधील "प" या अक्षरात आणि पुन्हा "करून" या यमकातील 'क' या अक्षरात - हटकून "अ" हा स्वर आलेला आहे.

क्वचित 'अ' च्या जागी ऱ्हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर वापरला जातो. परंतु तो अपवाद समजावा.

याच गझलेतील अजून एक शेर पहा.
आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा
माझाच भास माझ्या अंगावरून गेला
वरील शेरात यमक म्हणून "अंगावरून" हा शब्द आलेला आहे. या यमकात शेवटी "रून" ही दोन अक्षरे अटळपणे आलेली आहेत. परंतु त्याचवेळी "रून" या शेवटच्या दोन अक्षरांआधी असलेल्या 'व'  या अक्षरांतील 'अ' हा स्वर सांभाळला गेला आहे. म्हणजे "रून" ही शेवटची दोन अक्षरे कायम आणि त्याआधी येणाऱ्या "व" या अक्षरात "अ" ही अलामत कायम.

अलामतीची कल्पना देण्यासाठी मी याच गझलेतील अजून एक शेर येथे देतो-
कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-
"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"


स्वरचिन्ह उर्फ अलामत-२




गझल लिहिण्यासाठी फक्त शेवटपर्यंत एकाच वृत्तात लिहून भागत नाही, तर एकदा पहिल्या शेरात यमक आपल्या स्वरचिन्हासह प्रस्थापित झाले की, अलामतीसकट काफियाचे स्वरूप स्पष्ट झाले की, मग शेवटपर्यंत त्या अलामतीच्या कायद्यानुसारचे, ते स्वरचिन्ह सांभाळून नंतरचे यमकाचे शब्द योजावे लागतात.

उदाहरणार्थ-
हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाटतारा
उजेड येई दिव्यादिव्यातून बाटलेला

माझ्या एका गझलेचे हे दोन शेर आहेत. पहिल्या शेरात "छाटलेला" आणि "फाटलेला" असे दोन यमकाचे शब्द आहेत. येथे जर काळजीपूर्वक विचार केला, तर आपणास असे आढळून येईल की, गझलेच्या पहिल्या शेरातच यमकाचे स्वरूप स्पष्ट झालेले आहे.

ह्या यमकात शेवटची ती अक्षरे - "ट-ले-ला" ही अटळ आहेत, आणि त्याआधी येणाऱ्या "छा" आणि "फा" ह्या प्रत्येक अक्षरात "आ" ही अलामत आहे. ह्याच कायद्यानुसार ह्या गझलेत "काटलेला, दाटलेला, पहाटलेला, थाटलेला, वाटलेला, झपाटलेला" असे यमक म्हणून शब्द येतील. कारण 'ट-ले-ला' ह्या शेवटच्या तीन न बदलणाऱ्या अक्षरांआधी येणाऱ्या 'का, दा, हा, था, वा, पा' ह्या अक्षरांत न चुकता 'आ' ह्या स्वराची अलामत आलेली आहे. म्हणजे आधी 'आ' हा स्वर असलेले, 'आ' ही अलामत असलेले अक्षर आणि नंतर 'ट-ले-ला' ही शेवटची तीन न बदलणारी अक्षरे, असे हे यमक आहे.

अलामत गझलेनुसार येणाऱ्या विविध यमकात आपली जागा बदलू शकते. उदाहरणार्थ-
मी असा त्या बासरीचा सूर होतो
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो
मी न केली चौकशी साधी घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो

ह्या गझलेत सूर, दूर, आणि पूर ह्या यमकात 'ऊ' ही अलामत आहे. शेवटचे अक्षर 'र' हे आहे. येथे यमकातील शेवटून दुसऱ्या अक्षरात अलामत आहे.  ही अलामत सूर, दूर आणि पूर यमकातील 'सू, दू, आणि पू' ह्या शेवटून दुसऱ्या अक्षरातील 'ऊ' ह्या स्वरांची आहे. ह्याच गझलेतील अजून एक शेर पहा-
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो

ह्या शेरातील 'नामंजूर' ह्या यमकातील 'जू' ह्या अक्षरात सुरवातीचीच 'ऊ' ही अलामत आली आहे. मात्र 'र' ह्या शेवटच्या अक्षराच्या आधी येणाऱ्या अक्षरातच 'ऊ' ही अलामत आहे.
मघाशी आपण पाहिले की, 'ट-ले-ला' ह्या तीन न बदलणाऱ्या (छाटलेला, फाटलेला) अक्षरांआधी येणाऱ्या शेवटून चौथ्या अक्षरात 'आ' ही अलामत होती. तर आता वरील शेरात 'ऊ' ही अलामत असून तिचे स्थान मात्र यमकाच्या शेवटून दुसऱ्या अक्षरात आहे.
गझलेच्या पहिल्या शेरात 'जमीन' निश्चित होते. जमीन म्हणजे काय याचे स्पष्टीकरण आधी झालेले आहेच. परंतु ह्या जमिनीत असलेले यमक ऊर्फ काफिया कसा असावा, हे अलामतच ठरवते. आणि ह्या अलामतीच्या कायद्यानुसारच शेवटपर्यंत यमक ऊर्फ काफिया चालवायचा असतो. अलामत म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी आता मी शेवटचे उदाहरण देतो -
बेरका होता दिलासा मानभावी धीर होता
पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता
मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता
वरील शेरात 'धीर, खंजीर' आणि 'गंभीर'  ह्या यमकातील 'धी, जी, आणि भी' ह्या अक्षरात 'ई' ह्या स्वराची अलामत आहे. शेवटचे 'र' हे अक्षर मात्र कायम!


शेवटी महत्वाचे

महत्वाचे-

१. गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा.

२. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.

३. बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!

४. मराठी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. मराठी गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे.

५. यमक, अन्त्ययमक आणि वृत्तांचे बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद  असावा. फालतू शब्दांना जागा नसावी. अनावश्यक शब्दांनी वृत्ताची मात्रापूर्ती करू नये.

६. शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय.

७. शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे. शेर म्हणून परस्परांशी संबंध नसलेल्या दोन सुंदर ओळी एकत्र लिहिल्या म्हणजे शेर होत नाही. शेरात जे सांगायचे आहे, त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते, तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा प्रभावी समारोप असतो.

८. गझलेमधील शेर विरोधाभासावरच (PARADOX) आधारित असतात, ही समजूत पार चुकीची आहे. स्थलाभावी नमुन्यादाखल माझा एकच शेर येथे उद्धृत करतो-
उरली विरंगुळ्याला ही सांजवेळ माझी
उरल्या तुझ्या जराश्या प्राणात हालचाली

९. शेर लिहितांना शेवटच्या शब्दातील शेवटचे अक्षर लघू असल्यास ते कधीही गुरू करू नये.
शेराच्या ओळीतील शेवटी असलेले लघू अक्षर गुरू करण्याची एक अत्यंत वाईट सवय खोड मराठीतील बऱ्याच कवींना फार वर्षांपासून लागलेली आहे. उदाहरणार्थ-
ही वाट हुंदक्याची थकली अता रडून s s s
रहदारि गच्च आहे देवा तुझ्यापुढून s s s
एकवार 'रहदारि' मधील ऱ्हस्व "रि" समजून घेता येईल. पण ओळ संपतांना हा 'न s s s s s' कशासाठी?
म्हणून निदान तरूण पिढीने तरी ही चूक करू नये. व्याकरणाची बाब बाजूला ठेवली तर शेवटच्या लघू अक्षराला ओढूनताणून गुरू केल्यावर ओळीतील प्रसाद व माधुर्य कमी होते, हाही मुद्दा लक्षात घ्यावा.

१०. गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. ज्याचा आपल्या मातृभाषेवर संपूर्ण ताबा आहे. त्याला कोणताही विषय किंवा कोणतीही भावना शिवीगाळ न करता तेवढ्याच प्रभावीपणे शेरातून व्यक्त करता येते. क्वचित प्रसंगी अगदी अपरिहार्य झाल्यास एखादा असा शब्द त्या शेराच्या अभिव्यक्तीत चपखलपणे बसत असल्यास उपयोगात आणायला हरकत नाही. पण तसा शब्द अपरिहार्य असावा.

महाराष्ट्रातील तरुण पिढी ह्या माहितीचे सार्थक करील आणि महाराष्ट्रात यापुढे अधिकाधिक उत्कृष्ट व निर्दोष मराठी गझला लिहिल्या जातील, अशी मी आशा बाळगतो
जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही